2. यशोधरा व राहुल यांची भेट

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
*************************
2. यशोधरा व राहुल यांची भेट
Meeting Yashodhara and Rahula
*************************

1) शुद्धोदनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळीनी त्यांचे आदराने स्वागत केले.

2) पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोदनाने यशोधरेला बोलावणे पाठविले; परंतु ती म्हणाली, "खरोखर, जर माझा काही मान ठेवावयाचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील."

3) आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, 'यशोधरा कुठे आहे?' आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले.

4) आपले शिष्य सारिपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, "मी मुक्त आहे; परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये."

5) यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे आपुलकीने प्रेमनिर्भर झाली व तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही.

6) ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली.

7) परंतु तेथे शुद्धोदन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली.

8) यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोदन म्हणाला, "हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावनाविवशता नाही. पतिविरहाच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेंव्हा तिनेही केशवपन केले. जेंव्हा तिने ऐकले की, आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार यांचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते."

9) "हे केवळ तात्पुरत्या भावनाविवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय."

10) भगवंतांनी परिव्रज्जा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर, यशोधरेचे पावित्र्य, सौजन्य व सभ्यतापूर्ण सौम्यता आणि तिचे एकनिष्ठ प्रेम हे तिचे गुण त्यांना अनमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे 'कर्म' होते आणि तिच्या थोर पुण्याचाच (great merits) तो परिणाम होता.

11) तिचे दुःख शब्दातीत होते. आणि तरीही तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिचा आध्यात्मिक वारसा अधिकच गौरवांकित होऊन तिला अद्वितीय व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले होते.

12) नंतर यशोधरेने सात वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली,

13) "महान ब्रम्हाप्रमाणे दिसणारा तेजस्वी दिसणारा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी यांच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर. कारण पित्याची मालमत्ता वारसाहक्काने पुत्राकडेच आली पाहिजे."

14) राहुल उत्तरला, "कोण माझा पिता? शुद्धोदनाखेरीज दुसरा पिता मला माहित नाही."

15) यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या तथागतांकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, "तो पहा तुझा पिता. तुझा पिता शुद्धोदन नव्हे."

16) राहुल तथागतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि अतिशय प्रेमाने म्हणाला,

17) "आपण माझे पिता आहात ना?" आणि त्यांच्याजवळ उभा राहुन तो पुढे म्हणाला, "श्रमणा, आपली छायादेखील आनंदमय आहे." तथागत शांतच राहिले.

18) भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशिर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला.

19) कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः तथागतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही.

20) सारिपुत्ताकडे वळून तथागत म्हणाले, "माझा पुत्र आपला वारसा मागत आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन."

21) राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, "सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन (spiritual treasures) स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करुन ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असे धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे सदाचाराचा, धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या (highest bliss) प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या (culture of mind) साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय?"

22) "होय." राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले.

23) राहुल भिक्खुसंघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म