3. शाक्यांनी केलेले स्वागत

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
*************************
3. शाक्यांनी केलेले स्वागत
Reception by the Sakyas
*************************

1) भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देशबांधवांत दोन तट पडलेले त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता.

2) मागे शाक्य व कोलीय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्या वेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली.

3) त्या वेळच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळीसुद्धा त्यांना प्रणाम करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एकेक मुलगा देण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परततांना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले.

4) ज्या कुटुंबांनी एकेक मुलगा संघाला देण्याचे ठरविले होते त्यात अमितोदनाचे कुटुंब होते.

5) अमितोदनाला दोन मुलगे होते. एकाचे नाव अनुरुद्ध. त्याला अगदी लाडात वाढविले होते. दुस-याचे नाव होते महानाम.

6) महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला, "तू तरी संसारत्याग कर किंवा मी करतो." आणि अनुरुद्धाने उत्तर दिले. "माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे. म्हणून तूच तसे कर."

7) "परंतु प्रिय अनुरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो, ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेताला पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल. मग धान्य पाखडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल. आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल, आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल."

8) "हे काम कधीच संपत नाही, आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. काम कधी संपेल? श्रमाचा शेवट केव्हा होईल? आपल्या पंचेंद्रियांच्या सुखोपभोगांना न मुकता आपल्याला विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनुरुद्धा, काम हे कधीच संपत नाही; आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो."

9) "मग कौटुंबिक कर्तव्ये करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो," अनुरुद्ध म्हणाला.

10) आणि शाक्य अनुरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, "आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे."

11) शाक्य अनुरुद्धाने असे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली; "लाडक्या अनुरुध्दा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल. परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ?"

12) पुन्हा एकदा अनुरुध्दाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनुरुध्दाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली.

13) त्या वेळी शाक्य राजा भद्दीय याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनुरुध्दाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसारत्याग करणार नाही असे वाटून ती अनुरुध्दाला म्हणाली, "लाडक्या अनुरुध्दा, जर राजा शाक्य भद्दीय याने संसारत्याग केला तर तूही त्यांच्याबरोबर जा."

14) नंतर अनुरुध्द भद्दीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला; "प्रिय मित्रा, माझ्या संसारत्यागात तुझ्यामुळे अडथळा येत आहे."

15) "मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसारत्याग कर."

16) "प्रिय मित्रा, आपण दोघेही संसारत्याग करुया!"

17) "प्रिय मित्रा, संसारत्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करीन. तू एकटाच संसारत्याग कर," भद्दीय म्हणाला.

18) "प्रिय मित्रा, जर तू संसारत्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास की, "जर तुझ्या संसारत्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा मी दूर करतो. मी देखील संसारत्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे." म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसारत्याग करु या!"

19) शाक्य राजा भद्दीय अनुरुध्दाला म्हणाला: "प्रिय मित्रा, सात वर्षे थांब, सात वर्षानंतर आपण बरोबरच संसारत्याग करु."

20) "प्रिय मित्रा, सात वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी सात वर्षे थांबू शकत नाही."

21) भद्दीयाने ती मुदत सहा वर्षांवर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली. मग सात महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती एक महिन्यावर आणि मग एका पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनुरुध्द म्हणाला: "इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही."

22) मग राजा म्हणाला, "मित्रा, माझ्या पुत्रावर व भावांवर राज्य सोपवीपर्यंत सात दिवस थांब."

23) "सात दिवस म्हणजे काही फार नाहीत. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे." अनुरुद्धाने त्याला उत्तर दिले.

24) याप्रमाणे शाक्य राजा भद्दीय, अनुरुद्ध, आनंद, भगु, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रिडोद्यानावर चतुरंगसेनेसह मिळून जात असत, तसे या वेळीही चतुरंग सेनेसह ते सहा जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून सात जण बाहेर पडले.

25) काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले, "मित्रा, तू आता कपिलवस्तूला परत जा. तुझ्या उपजीविकेसाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो." आणि मग ते पुढे गेले.

26) ते पुढे चालू लागले आणि उपालीने घरी परत जाण्यासाठी त्यांचा निरोप घेतला.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म