5. भगवान बुद्धांचे उत्तर

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
*************************
5. भगवान बुद्धांचे उत्तर
The Buddha's Answer
*************************

1) "महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे."

2) "प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसता तर? आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करणार नाही? परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे."

3) "परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यांतील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे."

4) "यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हांला हे समजले पाहिजे की, पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे."

5) "वाटेत एकमेकांना भेटणा-या प्रवाश्यांप्रमाणे सर्व प्राणिमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल?"

6) "माणूस स्वजनांना दुस-या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो; ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार?"

7) "प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे, तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता?"

8) "ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ-अवेळ असेलही. काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो; परंतु स्तुत्य अशा सुखासाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो."

9) "महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपथ्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे."

10) "जो राज्याधिकार आभासमय आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहेत, थकवा आहे, जेथे सेवा करून घेतल्याने अन्याय उद्भवतो तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल?"

11) "सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमलफुलांनी आच्छादलेली शय्या मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म