7. सुरुवातीची लक्षणे
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
*********************
7. सुरुवातीची लक्षणे
( Early Traits )
*********************
( Early Traits )
*********************
1) जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्या वेळी तो एकांत स्थळी जाऊन एकाग्रता व ध्यान करण्याचा प्रयत्न करीत बसे.
2) त्याच्या बौध्दिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना, क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते.
3) कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पुरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोदन घेत असे.
4) सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे.
5) एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले.
6) ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला.
7) तो आपल्या मित्रांना म्हणाला, "एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करणे हे योग्य ठरते काय? मजुरानेे कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल?"
8) त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना. कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे. आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे.
9) शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे.
10) सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे.
11) जरी तो विद्वान होता तरी त्याने शारिरीक श्रमाचा कधीही तिरस्कार केला नाही.
12) तो क्षत्रिय कुळात (warrior class) जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे.
13) शिकार करणाऱ्या मंडळात तो सामील होण्यास तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत "तुला वाघांची भिती वाटते काय?" तेव्हा तो उत्तर देई, "मला माहीत आहे; तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात."
14) "शिकारीसाठी यायचे नसेल, तर निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणेबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये," त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिध्दार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, "मला निरुपद्रवी प्राण्याला मारताना पाहणे आवडत नाही."
15) सिद्वार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे.
16) त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, "तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे प्रशिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे."
17) सिध्दार्थ नेहमी गौतमीला विचारीत असे, "पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते?" आणि गौतमी उत्तर देई, "ते त्यांचे कर्तव्य आहे म्हणून."
18) तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, "मला असे सांग की, माणसाला मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते?"
गौतमी उत्तर देई, "ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे. पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील?"
19) "पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करु लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करु शकणार नाहीत का?" यावर गौतमी निरुत्तर होई.
20) तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून ध्यानाचा सराव करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. "मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत," अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरीता निवड करण्याविषयी तो त्यांना सल्ला देत असे.
21) परंतू त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत.
22) ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करु शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत.
23) त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास व कल आवडत नसे. ते क्षत्रियाच्या जीवनाच्या विरुद्ध आहे असे त्यांना वाटे.
24) योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृध्दिंगत होते, यावर सिध्दार्थाचा विश्वास होता. यासंबंधीची खात्री देताना तो म्हणे, "आपण जेव्हा प्राणिमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदभाव व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूंपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यांपासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूंचा द्वेष करतो."
25) ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादांपलीकडे जातो तेव्हाच हे करु शकतो, अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. (...when we in our contemplation rise above the limitations of practical life)
26) सिद्धार्थाचे बालपण परमोच्च करुणामय प्रेमभावनेने व्यापलेले होते. (supreme sense of compassion)
27) एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शान्ती आणि सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला.
28) त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन वेदनांनी तडफडत होता.
29) सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या ह्रदयाशी धरले.
30) सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की निष्पाप पक्ष्याला कोणी मारले असावे? थोड्याच वेळात त्याचा भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की "आकाशात उडत असलेल्या एका पक्ष्याला मी बाण मारला आहे." "तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो येथेच कुठे तरी पडला असावा. तो तू पाहिला आहेस काय?" सिद्धार्थाला त्याने विचारले.
31) सिद्धार्थ होय म्हणाला आणि त्याच्या उपायांनी तोपर्यंत बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला.
32) देवदत्ताने मागणी केली की "माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर" पण सिध्दार्थाने ते नाकारले. त्यामुळे दोघांमध्ये तीव्र वाद झाला.
33) देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्ष्याचा मालक मी आहे. कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो.
34) सिध्दार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, जो रक्षण करतो, केवळ त्यालाच त्यांच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला जीव घ्यावयाचा असतो तो त्यांचा मालक कसा होऊ शकतो.
35) या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला (referred to arbitration). लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टीकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला.
36) त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्ष्याचा जीव वाचविणे त्याने अधिक पसंत केले.
37) सिद्धार्थ गौतमाची बालपणीच प्रकट झालेली स्वभाव लक्षणे ही अशी होती.
☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुध्द आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: ८. विवाह
*********************
Comments
Post a Comment