1. कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
Book I, Part II - Renunciation Forever
*********************
1. कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण
From Kapilvatsu to Rajagraha
***********************

1) कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला.

2) राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता. मोठमोठे तत्त्वज्ञ (great philosophers) आणि विचारवंत (leaders of thought) यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते.

3) हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला.

4) वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला, नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राम्हण योगिनीच्या आश्रमात गेला; आणि मग रैवत (Raivata) नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला. त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले.

5) त्याचे आकर्षक व्यक्तिमत्त्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर, त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करु लागले.

6) त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही आणि उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही.

7) काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत, तर काही पुज्य बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन करीत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधीत. कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याखेरीज पुढे जात नसे.

8 ) ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून संकोच वाटे. वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत. त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत.

9) त्याच्या भुवया, त्याचे कपाळ, -- त्याचे मुख, त्याचे शरीर, हात-पाय किंवा त्याची चालण्याची ढब -- यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की, त्या क्षणीच त्यांची दृष्टी खिळून राही.

10) दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या, पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत गौतम येऊन पोहोचला.

11) राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली.

12) राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ 400 मैल (~640 km) अंतरावर आहे.

13) हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला.


🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. बिंबिसार राजाचा उपदेश
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म