14. संघाशी संघर्ष
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
14. संघाशी संघर्ष
(Conflict with the Sangh)
*********************
1) सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करुन घेतल्यानंतर आठ वर्षे लोटली होती.
2) संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते. व त्यामुळे तो सर्वांचा प्रिय झाला होता.
3) तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी अशी एक घटना घडली की जी शुद्धोदनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती (crisis) ठरली.
4) या दुःखान्तिकेचा आरंभ असा आहे:
5) शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून "कोलियांचे" राज्य होते. "रोहिणी" नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती.
6) रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरीता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे.
7) सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्षे झाली त्या वर्षी, शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरुन फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.
8.) जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली, तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले.
9) म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन (session, सत्र) बोलाविले.
10) संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, "आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापुर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केलेली आहेत. पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे. आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्याविरुध्द युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरूध्द संघाने युद्ध पुकारावे असा ठराव मी मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे."
11) सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, "या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. आणि जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो."
12) सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, "संघाने कोलियांच्या विरुध्द युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये. दोष कोणाचा आहे याची खात्री करुन घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहीजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुध्दा निर्दोष नाही हे सिद्ध होते"
13) सेनापतीने उत्तर दिले, "होय, आपल्या लोकांनी आक्रमण केले. तथापि, आपण हे विसरता कामा नये की, प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती"
14) सिद्धार्थ गौतम म्हणाला, "यावरुन स्पष्ट होते की, आपण दोषांपासून पुर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की, आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडण्यास सांगावे. आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा. आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे."
15) सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, "माझी खात्री आहे की, जोपर्यंत कोलियांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत त्यांचा हा उपद्रव थांबणार नाही."
16) यामुळे मूळ ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले.
17) सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा (युद्ध व सैन्यभरतीचा) प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, "हा प्रस्ताव मान्य करु नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही."
18) सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की, "क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करु शकत नाही. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे."
19) "यज्ञयाग करणे हा ब्राम्हणाचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्याचा धर्म आहे, तर सेवा व चाकरी करणे हा शुद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म(duty) पालन करण्यात पुण्य(merit) आहे. हीच आपल्या शास्रांची आज्ञा आहे."
20) सिद्धार्थाने उत्तर दिले, "धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, शत्रुत्वावर प्रेमानेच मात करता येते, हे समजणे म्हणजे धर्म."
21) अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, "या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे, की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे, हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करुन घेऊया."
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १५. देशत्यागाची तयारी
*********************
Comments
Post a Comment