16. मार्ग सापडला - परिव्रज्या

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
16. मार्ग सापडला - परिव्रज्या
(Parivrajya - The Way Out)
***********************

1) सेनापती म्हणाला, "तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण जरी तू देहान्ताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी कोशलाधिपतीस ही गोष्ट समजणारच. आणि तो असाच निष्कर्ष काढेल की, ही शिक्षा संघानेच दिली आहे. आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल व संघाविरुद्ध कारवाई करेल."

2) सिद्धार्थ गौतम म्हणाला, "हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच आहे."

3) सेनापतीला वाटले की, हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती.

4) म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, "तुझ्या आई-वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यावाचून तुला परिव्राजक कसे होता येईल?"

5) आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करु असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले. आणि तो म्हणाला, "त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो."

6) सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्यांनी तो मान्य केला.

7) सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, "कृपा करुन माझं म्हणणं ऐका. मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे."

8) बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, "सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळेल आणि त्वरित देशत्याग करेल याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की, ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही."

9) "आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच जाणार आहे त्याअर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय?"

10) "या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुध्द शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले, तर कोलियांशी युध्द करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला कळेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही."

11) "म्हणून मी पुन्हा सुचवितो की, सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ याच्यात काही काळ जाऊ द्यावा; म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही."

12) संघाला पटले, की ही फारच महत्त्वाची सूचना आहे. आणि तात्कालिक व तातडीच्या निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले.

13) अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःखपर्यवसाची सभा संपली. आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता, परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते, त्या अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निःश्वास सोडला. 


🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १७. निरोपाचे शब्द
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म