17. निरोप

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
17. निरोप
(Parting Words)
***********************

1) शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृतांत सिध्दार्थ गौतम घरी परतण्यापुर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता.

2) कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले, की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत.

3) शुद्धोदन म्हणाला: "आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो. पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही"

4) सिद्धार्थाने उत्तर दिले, "मला सुद्धा गोष्टींना असे वळण मिळेल असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तीवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती."

5) "दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की, माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही."

6) "तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरुन धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यांपासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जीे काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो."

7) शुद्धोदनाचे यामुळे समाधान झाले नाही. तो म्हणाला, "आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस." "पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्विकारले," सिद्धार्थाने उत्तर दिले. "शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता, याचा तर आपण विचार करा."

8) "पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे?" शुद्धोदन आंक्रदून म्हणाला. "सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर देशत्याग का करू नये?"

9) रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोदनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, "बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस?"

10) सिद्धार्थ म्हणाला, "आई, तू क्षत्रियांची माता आहेस हे तू आजपर्यत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय?"

11) "नाही!" गौतमी उत्तरली, "ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस. लोकांपासून अगदी दूर, हिंस्र पशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल."

12) "मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय?" सिद्धार्थाने गौतमीला विचारले.

13) याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की: "आपण सर्वजन शाक्यांचा देश सोडून कोशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कोशल देशात जाऊन राहू शकतो."

14) "पण आई! सर्व शाक्यजन काय म्हणतील?" सिद्धार्थाने प्रश्न केला. "याला देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रज्येचे कारण कोशलाधिपतीला समजेल, असे मी वाचेने व कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे."

15) "मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे. पण त्यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे?"

16) "पण ही घाई कशाला?" शुद्धोदन मध्येच म्हणाला, "शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे."

17) "कदाचित युद्ध होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करु नये? कदाचित तुला शाक्यांत राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे."

18) सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, "मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे."

19) "मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेणेस संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे."

20) "मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील."

21) "आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे."

22) गौतमी व शुद्धोदन स्तब्ध राहिले.

23) सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच शांतता भंग केली. ती म्हणाली, "कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे."

24) सिद्धार्थाने विचारले, "यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते?"

25) त्याला वाटले की ती मूर्च्छित होऊन पडेल. पण तसे काही झाले नाही.

26) आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, "मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करु शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारीण झाले नसते."

27) "आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला संमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे."

28) पुढे ती म्हणाली, "असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करु नका. माझ्या शरीरात प्राण असे पर्यंत मी त्यांची देखभाल करीन."

29) "ज्याअर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्याअर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी व सुखकारक ठरेल, हीच एक केवळ माझी इच्छा आहे."

30) सिद्धार्थ गौतम खूपच प्रभावित झाला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्री आहे, याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला, याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला.


🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १८. गृहत्याग
***********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म