18. गृहत्याग

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
18. गृहत्याग
(Leaving His Home)
***********************

1) सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या धारण करण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरुढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न (Channa)याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला.

2) तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखादा नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तसे अनेक स्त्री-पुरुष यांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली.

3) आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले.

4) ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावूक झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते.

5) काही स्त्रियांना वाटले कि तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे. कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता.

6) काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला.

7) दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निःश्वास टाकीत होत्या.

8) अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे एकटक केवळ पाहात राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत विस्मित व स्तब्ध होऊन त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या.

9) मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करुन घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला.

10) आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहू नये असे सिद्धार्थाला वाटत होते. कारण त्याला ठाऊक होते की दुःखवेगाने ते स्वतःला सावरुन धरु शकणार नाहीत. परंतु ते त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचले होते.

11) आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले.

12) आपल्या मातापित्यांस पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशिर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की, त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडत रडत त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले.

13) छन्न कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून इकडे येऊन उभा होता. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरुन आले आणि तो रडू लागला.

14) मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले.

15) त्याने परिव्राजकाला आवश्यक असे मुंडन करुन घेतले. त्याचा भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले.

16) अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करुन सिद्धार्थ परिव्रज्येची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला.

17) भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो विधी-समारंभ केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहिर केले.

18) परिव्रज्या घेण्याची व अकारण विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा विधी-समारंभ आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला.

19) जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गौतमाला परिव्रज्या घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला.

20) त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला.

21) तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून बोलला: "बंधुंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यामुळे काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजुने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित् यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा." ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परत जाऊ लागला.

22) शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले.

23) सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली.

24) परिव्रज्या (संन्यास) ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षे होते.

25) लोक त्याची आठवण करुन त्याची प्रशंसा करत व हळहळ व्यक्त करून म्हणत, "हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणसाठी तो स्वकीयांशी लढला."

26) "तो असा युवक होता की जो स्वकीयांच्या बहुमतांपुढे झुकला नाहीच, पण स्वच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्रय, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशाप्रकारे जात आहे, की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही."

27) "हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होता. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात याला तुलना नाही. त्याला 'शाक्यमुनी' अथवा 'शाक्यसिंह' असेच म्हणावे लागेल."

28) शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्यासंबंधी तिने म्हटले होते, "धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला."


🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १९. राजपुत्र आणि त्याचा सेवक
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म