1. नव्या प्रकाशासाठी चिंतन

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग चवथा- ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी
Enlightenment and the Vision of a New Way
*********************
1. नव्या प्रकाशासाठी चिंतन
Meditation for New Light
**************************

1) अन्न ग्रहण करुन ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करु लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले.

2) ते अपयश इतके मोठे होते की, कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थातच वाईट वाटले. पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही.

3) एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की, सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने स्वप्नांचा अर्थ लावला.

4) त्याने आपले भविष्य जाणण्याचासुद्धा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला, "जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊदे; नसेल तर खालच्या दिशेने जाऊदे." आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले.

5) आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने ऊरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळवृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला.

6) चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली. कारण सर्व प्रकारची अपवित्रता, दोष (defilements) घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात.

7) गौतम आसन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळवृक्षाखाली बसला. ज्ञानप्राप्ती करुन घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, "कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही."

8) नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा नाग-लोकांचा राजा आणि त्यांची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करुन घेणार अशा खात्रीने त्यांनी पुढीलप्रमाणे स्तुती केली.

9) "हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे, आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे; त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच."

10) "हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत, आणि आकाशात मंदमंद वायुलहरी वाहत आहेत; त्या अर्थी आपले ईप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित."

11) चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना पुराणांतरी (mythologically) माराची (कामाची) मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले.

12) कदाचित माराची ही टोळी आपल्याला पराभूत करेल आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भिती वाटली.

13) दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राम्हण बळी पडले हे त्याला माहित होते.

14) म्हणून आपल्या अंगी असलेले सर्व धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, "माझ्यामध्ये श्रद्धा (faith) आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनो, माझा पराभव कसा करु शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील; पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते."

15) एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले.

16) गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा निघून जातो; त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. ज्ञानप्राप्ती
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म