1. धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग दोन- धम्म हा सद्धम्म होण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे
Section II
Dhamma to be Saddhamma must promote Pradnya
*************************
1. धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो
Dhamma is Saddhamma when it makes learning open to all.
************************

1) *ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, असा ब्राम्हणी सिद्धांत होता*. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे.

2) ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राम्हणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती; आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुषवर्गालाच होती.

3) *स्त्रिया ह्या ब्राम्हण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना ज्ञानार्जनाचा काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता.*

4) *ब्राम्हणांच्या ह्या अन्यायकारक सिद्धांताविरुद्ध (atrocious doctrine) भगवान बुद्धांनी बंड उभारले.* (raised a revolt.)

5) ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे, असे भगवान बुद्ध शिकवित असत.

6) पुष्कळ ब्राम्हणांनी त्यांच्या मताला विरोध केला. लोहिच्च ब्राम्हणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो.

7) एकदा *कोसल जनपदातून* आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता, तथागत *शालवाटिका* या नावाच्या *शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित* अशा एका खेडेगावी आले.

8). या वेळी शालवाटिकेत लोहिच्च नावाचा एक ब्राम्हण राहत असे. ही शालवाटिका म्हणजे चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राम्हणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता.

9) *जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राम्हणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहिच्च ब्राम्हणाचे मत होते.*

10) तथागत शालवाटिकेत राहात आहेत हे लोहिच्च ब्राम्हणाला कळले.

11) हे कळल्यावर लोहिच्चाने आपला *न्हावी भेसिक* यास सांगितले, "भेसिका, इकडे ये, ऐक. तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा, आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृतिस्वास्थ्य ठीक आहे ना?" हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, "उद्या आपण आपल्या भिक्खूसंघासह लोहिच्च ब्राम्हणाकडे भोजनास यावे."

12) तो न्हावी म्हणाला, "ठीक आहे, महाराज."

13) लोहिच्चाच्या आज्ञेनुसार त्याने तथागतांकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्यांना आमंत्रण दिले. तथागतांनी त्या विनंतीला मूक संमती दिली.

14) दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खुसंघासह शालवाटिकेकडे निघाले.

15) भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहिच्चाने पाठविलेला दूत, भेसिक न्हावी भगवान बुद्धांच्यामागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात *त्याने तथागतांना लोहिच्चाचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राम्हणाने कोणतेही ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये, हे सांगितले.*

16) तथागताने उत्तर दिले, "भेसिका, ठीक आहे, ठीक आहे."

17) तथागत त्या लोहिच्च ब्राम्हणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले.

18) त्या लोहिच्च ब्राम्हणाने बुद्ध ज्यांचा प्रमुख होता, अशा त्या संघाला आपल्या हाताने कठीण आणि मऊ प्रकारचे गोड अन्न ते नको म्हणेपर्यंत वाढले.

19) तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहिच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला.

20) लोहिच्च अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, "लोक म्हणतात की 'श्रमण अथवा ब्राम्हणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शुद्रांना शिकवू नये' असे तुझे मत आहे; हे खरे आहे का?"

21) लोहिच्च म्हणाला, "होय. असेच माझे मत आहे."

22) "लोहिच्च, तुला काय वाटते तू शालवाटिकेत नांदत आहेस काय?"
"होय. गौतमा,मी शालवाटिकेत नांदत आहे."

23) "लोहिच्च, मग कल्पना कर- जर कोणी असे बोलला, "या शालवाटिकेत लोहिच्च ब्राम्हणांचे राज्य आहे. त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे होणारे उत्पन्न आणि त्यात निर्माण होणारा माल याचा उपभोग घेऊ दे. दुसऱ्या कोणालाही काहीही देऊ नका." असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही?"

24) "अर्थात गौतमा! मी त्याला संकटनिर्माताच समजेन."

25) "अशा संकटनिर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील का?"

26) "अर्थात, नाही. गौतमा, मी त्यांना त्यांचा हितकर्ता मानणार नाही."

27) "अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील?"

28) "गौतमा! मी ते वैरभावयुक्त आहे असे मानीन."

29) "पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला की वाईट मानशील?"

30) "गौतमा, तो सिद्धांत मी वाईट आहे असेच मानीन."

31) "मग लोहिच्च मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय?"

32) "होय, गौतमा. तो काशी आणि कोसलचा अधिपती आहे."

33) "मग लोहिच्च, कल्पना कर की कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा यांच्या छताखाली काशी आणि कोसल प्रांत आहे. त्याला एकट्यालाच त्या काशी आणि कोशलचे उत्त्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या. दुसऱ्या कोणाला काहीही देऊ नका; तर असे बोलणाऱ्या मनुष्याला, तुला आणि ते जे प्रसेनजिताचे आश्रीत आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही?"

34) "होय, गौतमा. मी त्यांना संकट कर्ताच समजेन."

35) "अशा संकटकर्ता माणसाला तू हितकर्ता मानशील का?"

36) "नाही, गौतमा. तो त्यांचा हितकर्ता नव्हे."

37) "आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे?"

38) "गौतमा, ते वैरयुक्त आहे."

39) "ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते चांगला की वाईट?"

40) "गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे."

41) "मग लोहिच्च तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा. दुसऱ्या कोणाला त्यातील काहीही देऊ नये. त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोशलचा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काहीही देऊ नये; तर तो तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजांच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्याच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावनेचा प्रभाव ठरतो आणि अंतःकरणात वैरभावनेचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत गैर आहे."

42) "तद्धत, हे लोहिच्च जो कोणी श्रमण अथवा ब्राम्हण विद्या आणि ज्ञान स्त्री शुद्रांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकटनिर्माता ठरतो."

43) "अशा प्रकारे जो कोणी स्त्री-शुद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्यांच्या मार्गात आडचणी निर्माण करतो. तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतीत नाही तो त्यांचा शत्रू ठरतो."

43) "आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म