1. धर्मोपदेश करावा की करु नये

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
(Campaign of Conversion)
*************************
भाग पहिला- बुद्ध आणि त्यांचा विषादयोग
Buddha and His Vishad Yoga
*************************
1. धर्मोपदेश करावा की करु नये
To preach or not to preach
*************************

1) ज्ञानप्राप्ती करुन घेतल्यावर आणि आपल्या धम्ममार्गाची रुपरेखा निश्चित केल्यावर बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना आपल्या तत्त्वज्ञानाचा धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करुन घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे?

2) ते स्वतःशीच म्हणाले, "नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे; परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही."

3) "ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करुन घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करुन घेणे कठीण आहे."

4) "आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहात नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे."

5) "मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्यजातीला कठीण आहे."

6) "जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करुनही त्यांनी तिचे अनुसरण केले नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल."

7) "जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करुन घेण्यासाठी का करू नये?" त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला. "निदान मी स्वतःचे तरी कल्याण करुन घेऊ शकेन."

8 ) याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले.

9) बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रम्ह सहंपती विचार करु लागला, "खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक, संबुद्ध, तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल."

10) चिंताग्रस्त असा ब्रम्ह सहंपती ब्रम्हलोक सोडून आला व बुद्धांच्यापुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरुन नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, "आपण आता सिद्धार्थ गौतम नसून बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्धत्त्व प्राप्त झालेले आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंधःकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारु शकता? ज्ञानाचा प्रकाश जगात घेऊन जाण्याचे कसे नाकारु शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता?"

11) "आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधःपात होत आहे."

12) ब्रम्हा सहंपती पुढे म्हणाला, "भगवंत जाणतच आहेत की, प्राचीन काळापासून मगधवासीयांत अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे."

13) "आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय?"

14) "पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली, खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून, त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवंता, दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा."

15) "जन्मऋणांतून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, ऊठ, जगाकडे जा. त्याच्याकडे पाठ फिरवू नको."

16) "भगवन् देव आणि मानव यांच्यावरील करुणाबुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करोत."

17) बुद्धांनी उत्तर दिले, "थोर मानवश्रेष्ठ ब्रम्हा, (Eminent and Excellent among men), मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले."

18) जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून बुद्धांना पटले की, हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही.

19) संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांंना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले.

20) बुद्धांना हे पटले की, त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की, जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे. आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुन्हा जाऊन सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले.

21) म्हणून बुद्धांनी ब्रम्ह सहंपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला.



*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. ब्रम्ह सहंपती सुवार्ता जाहीर करतो
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म