1. महाप्रजापति गौतमी, यशोधरा व तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग सातवा- स्रियांची धम्मदीक्षा
Conversion of Women
*************************
1. महाप्रजापति गौतमी, यशोधरा व तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा
Conversion of Mahaprajapati Gotami, Yeshodhara and her companions
*************************

1) जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्रियांनादेखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती.

2) अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते.

3) ज्या वेळी भगवंत शाक्यांसह *न्यग्रोधारामात* राहात होते त्या वेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली: "भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार (doctrine and discipline) स्त्रियांना परिव्राजक होण्याची आणि त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल!"

4) *"नको गौतमी, असा विचार आपल्या मनात येऊ देऊ नकोस!"* पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दांत केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले.

5) नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवन्तांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत ती परत गेली.

6) पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी न्यग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघप्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या.

7) भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजकाचा स्वतःच वेष धारण करून तथागतांसमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रव्रज्ज्या घेतली असल्याचे तथागतांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले.

8) तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले. पीतवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळांतील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्या वेळी वैशाली येथे महावनातील कूटागार भवनात वास्तव्य केले होते.

9) महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिणींसह यथावकाश वैशालीला येऊन पोहचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कूटागाराच्या सभागृहात आली.

10) तथागत न्यग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली.

11) आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले.

12) तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, "सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस?"
"कारण, आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करण्याची गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत." महाप्रजापती म्हणाली.

13) नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतांस अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो तथागतांना म्हणाला, "पहा भगवन्, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे; तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत; दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करुन आणि भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करुन गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवन्, तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल."

14) "महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले, त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवन्, संसारत्याग करुन गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल."

15) "नको, आनंदा. स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही." आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दांत तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले.

16) नंतर स्थविर आनंदाने तथागतांस विचारले, "स्त्रियांना परिव्रज्ज्या घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय?"

17) *"ब्राम्हण असे मानतात की, शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही. हे भगवंतांना माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रज्ज्या घेऊ देत नाहीत काय? तथागतांचे मत ब्राम्हणांप्रमाणेच आहे काय?"*

18) "जशी ब्राह्मणांना दिली, तशीच शूद्रांनादेखील परिव्रज्ज्या घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवन्, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय?"

19) "तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय?"

20) तथागतांनी उत्तर दिले, "आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. *निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषांइतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे.* आनंदा! माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. *स्त्री-पुरुषांतील विषमतेच्या तत्त्वांचा मी पुरस्कर्ता नाही.* महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री-पुरुषांतील विषमतेवर आधारलेला नाही. तो *व्यावहारिक कारणांवर* (practical grounds) आधारलेला आहे."

21) "भगवन्, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे; परंतु व्यावहारिक अडचणीमुळे तथागतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्रीपुरुषांतील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? तथागतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणींतून पार पडण्यासाठी काही नियम तथागतांना तयार करता येणार नाही काय?"

22) "ठीक आहे; आनंदा! माझा धम्म आणि विनय यांचे पालन करुन परिव्रज्ज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण *आठ अटींवर* मी ती संमती देतो. ते आठ मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल."

23) नंतर तथागतांकडून या आठ मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले.

24) "आनंदा, *अलंकारप्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पांच्या, जाईच्या फुलांच्या किंवा स्तिमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील त्याचप्रमाणे या आठ मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही."* महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली.

25) नंतर स्थविर आनंद तथागतांकडे परत गेला आणि त्यांना वंदन करुन तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतांस म्हणाला; "भगवन्, आठ मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे. म्हणून तिने *उपसंपदा* (Upasampada initiation) घेतली आहे आणि *संघप्रवेश* केला आहे असे मानावे." (entry into the Sangha)

26) महाप्रजापतीला उपसंपदा (ordination) मिळाली आणि तिच्यासह आलेल्या *पाचशे शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली.* याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतांसमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला.

27) इतर पाचशे भिक्षुणींना तथागतांचा एक शिष्य *नंदक* याने उपदेश दिला.

28) महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुणी झाल्या त्यांत *यशोधराही* होती. तिच्या संघप्रवेशानंतर ती *भद्दाकच्चना (भद्रा कात्यायना)* म्हणून ओळखली जाऊ लागली (Bhadda Kaccana).

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म