1. शुद्धोदनाची शेवटची भेट
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
*************************
1. शुद्धोदनाची अखेरची भेट
Suddhodana and the Last Look
*************************
1) सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले.
2) भगवंत राजगृहात राहात असल्याचे ऐकल्यावर शुद्धोदनाने निरोप पाठविला की, "मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला; परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही."
3) निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदायिन् असे असून तो शुद्धोदनाच्या दरबारातील एका मनुष्याचा मुलगा होता.
4) तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला, "जगद्वंदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहात आहेत."
5) तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्यासोबत बऱ्याच मोठ्या संख्येने असलेल्या शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले.
6) भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते. परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोदनाला सांगण्यासाठी कालुदायिन् पुढे निघून गेला.
7) लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. "संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे." ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते.
8) आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोदन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला, तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य, सन्माननीय उच्चपद आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात.
9) हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रुप! तो महान श्रमण त्यांच्या ह्रदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती जास्त होते! तो मुनीश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अर्हत, सत्यविद् आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता.
10) आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोदन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, "आम्ही तुला पाहिल्याला आता सात वर्षे लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहात होतो!"
11) नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती. पण तसे धैर्य त्याला होईना. "सिद्धार्था," तो मनातल्या मनात उदगारला. "सिद्धार्था, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो!" परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाली.
12) याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. तरीपण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला.
13) "मी तुला माझे राज्य देईन," राजा म्हणाला, "पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील."
14) आणि भगवंत म्हणाले, "राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निब्बाण यांचा प्रणेता आपल्या ह्रदयात प्रवेश करील."
15) आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोदनाला खूप आनंद झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, "हे अद्भुत परिवर्तन आहे! दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे ह्रदय दुःखाने जड झाले होते; पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखावयास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील."
16) शुद्धोदन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले.
17) दुसऱ्या दिवशी सकाळी तथागत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले.
18) त्या वेळी पुढील बातमी पसरली: "ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चीवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे!"
19) ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोदन घाईघाईने गेला व तथागतांना म्हणाला, "तू माझ्या नावाला असा काळिमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय?"
20) तथागत उत्तरले, "ही माझ्या संघाची प्रथा आहे."
21) "पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस."
22). "होय, पिताजी," बुद्ध म्हणाले, "आपण राजांचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे; परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत."
23) शुद्धोदन निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, "जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या ह्या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या."
24) तथागत पित्याला पुढे म्हणाले, "जर आपण आपल्या सुख-स्वप्नांतून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सतधम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल."
25) शुद्धोदनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, "बाळ! तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन."
Comments
Post a Comment