1. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
Conversion of the Fallen and the Criminals
*************************
1. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा
Conversion of a Vagabond
*************************

1) प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहात होता. तो आईवडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि त्यातच मश्गूल राही.

2) परंतु, पूजा आणि बलिदान यांसारखे शारीरीक कष्टाचे विधी कितीही केले तरी, सतत तीन वर्षे दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना.

3) शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरविले. तेथे पोहोचल्यावर बुद्धांचे तेजस्वी व्यक्तीमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे, हे सांगितले.

4) नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही, आणि ते ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही, अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की, त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले.

5) तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलाचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले.

6) मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्याविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या.

7) "थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो."

8) "शहाणा (भद्र) मनुष्य ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही; संपत्ती, संतती, जमीनजुमला यांची त्याला आसक्ती नसते. नेहमी शीलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्याच सिद्धांताच्या (किंवा संपत्तीच्या किंवा मानाच्या) नादी लागत नाही."

9) "अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे (पावित्र्याकडे) त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म