1. 'बुद्ध आणि वैदिक ऋषी'

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
The Buddha and His Predecessors
*********************
1. 'बुद्ध आणि वैदिक ऋषी'
The Buddha and the Vedic Rishis
*************************

1) वेद हा मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना "ऋषी" म्हणतात.

2) मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापति, ब्रम्ह, महिर्दि, यम इ. देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत.

3) धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय.

4) वेदांमध्ये फारसे तत्वज्ञान नाही. परंतु असे काही वैदिक ऋषी होते की, ज्यांनी तात्विक स्वरुपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या.

5) 1)अघमर्षण, 2)प्रजापती परमेष्ठि, 3)ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती, 4)अनिल, 5)दीर्घतमा, 6)नारायण, 7)हिरण्यगर्भ आणि 8)विश्वकर्मा हे ते ऋषी होत.

6) या वैदिक तत्त्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या: जग उत्पन्न कसे झाले? वस्तूंची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे?

7) अघमर्षण म्हणतो कि जग तपसपासून (उष्णतेपासून) निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्त्व होय. त्यापासून अनाद्यनन्त असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र (तमस्) उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली.

8 ) ब्रह्मणस्पतीने 'असत्' पासून 'सत्' ची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला (being from non-being). त्याने 'असत्' या शब्दाचा अर्थ अनादी अनंत असा सांगितला. सत् हे मूलतः असत् पासून उत्पन्न झाले. जे जे सत् (अस्तित्वात असलेले) आहे, आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत् (अस्तित्वात नसलेले) आहे, त्या सर्वांचा असत् हा मूलाधार आहे.

9) प्रजापति परमेष्ठीने "असत् पासून सत् निर्माण झाले काय?" या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की, या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्याच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ - जे पाणी - ते सत् आणि असत् यांच्या व्याख्येत बसत नाही.

10) परमेष्ठीने जडत्व आणि चेतना (matter and motive power) यांत भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रुपातंर विशिष्ट वस्तूमध्ये करुन घेते. या तत्वाला 'काम' किंवा 'वैश्विक इच्छा' असे नाव त्याने दिले.

11) अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू (air) हे मूलतत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्यशक्ती असते. त्याच्यात निर्मितीतत्व निसर्गतःच असते.

12) दीर्घतमा याने सांगितले की, सर्व प्राणिमात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढेमागे सरकत असतो.

13) सूर्य करडया रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात.

14) सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याची बीजे होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते.

15) नारायणाच्या मतानुसार पुरुष (परमेश्वर) हे पहिले जगत्कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतु, पक्षी, सर्व पशू, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पती पुरुषांपासून होते.

16) तात्त्विकदृष्टया हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ (बीज). या विश्वाच्या महान शक्तीपासूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली.

17) हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरतत्त्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्त्व अग्नीपासूनच बनले आहे.

18) अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूळ पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करुन त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या, अर्धवट आणि असमाधानकारक होत. रुपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्यशक्ती, निर्मिती तत्त्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच.

19) विश्वकर्म्याचे मत असे होते कि परमेश्वर ही चैतन्यशक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो अज (जन्म नसलेला) unborn one आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहित आहे.

20) बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले.

21) परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही.

22) त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत.

23) म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले.

24) त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करुन घेण्यासाठी ते चाचपडत होते; परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नाहीत.

25) त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत.

26) म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
२. तत्त्ववेत्ता कपिल
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म