1. वारसाची नियुक्ती

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
1. वारसाची नियुक्ती
The Appointment of a Successor
*************************

1) एकदा तथागत बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात वस्तीस होते.

2) त्यावेळी पावामध्ये नुकतेच नाथपुत्र निगण्ठांचे देहावसान झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर निगण्ठियांत दुही होऊन भांडणे सुरु झाली होती. त्यांचे दोन पक्ष आपआपसात झगडताना एकमेकांना वाग्बाणांनी घायाळ करीत होते.

3) श्रामनेर चुंद पावामध्ये वर्षावास संपवून स्थविर आनंदास भेटण्यास आला असताना बोलला, "नाथपुत्र निगण्ठांचे नुकतेच पावा येथे देहावसान झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर निगण्ठियांत दुही माजली असून ते आपआपसांत झगडताना परस्परांना वाग्बाणांनी घायाळ करीत आहेत. याचे कारण त्यांना कोणी रक्षणकर्ता नाही."

4) त्यावर स्थविर आनंद म्हणाला, "ही महत्त्वाची हकीकत तथागत बुद्धांना सांगणे इष्ट आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करु या."

5) "ठीक, महाशय." चुंद बोलला.

6) त्यावर आनंद व चुंद दोघेही तथागतांपाशी गेले आणि त्यांना अभिवादन करुन निगण्ठियांची हकीकत कथन केली व आपला वारस नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली.

7) चुंदाचे निवेदन ऐकून तथागत म्हणाले, "चुंद, विचार कर की, जगात एक आचार्य निर्माण होतो. अर्हत, सम्यक संबुद्ध. तो आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रसार करतो, जो सद्धर्म शांतीदायक, प्रभावी, मार्गदर्शक व सुबोध असा आहे. पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्याच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो; ..."

8). "अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही विघातक ठरते."

9) "पण चुंद, जगात एक अर्हत व सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे. त्याने आपल्या धम्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे. ज्यांचा सद्धम्म प्रभावशाली व मार्गदर्शक असून शांतीदायक आहे. ज्यांचे शिष्य पारंगत आहेत. असा तो सद्धम्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरुप दर्शवीत असताना त्या आचार्याचे देहावसान होते;..."

10) "अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही. मग वारसाची गरज कुठे भासते?"

11) दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यानंतर तथागत म्हणाले, "आनंदा, माझ्या धम्माबद्दल ज्यांचे एकमत नाही असे दोन भिक्खू तरी तुला आढळलेत काय?"

12) "नाही. पण आज जे तथागतांच्या निकट आहेत, ते तथागतांच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत, संघाच्या नियमांबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे. आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल."

13) *"आनंद, विनयाबाबत भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात. पण भिक्खूसंघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल."*

14) "धम्मासंबधीचे वादविवाद हुकूमशहादेखील मिटवू शकत नाही. आणि वारस जर हुकुमशहासारखा वागणार नसेल तर तो काय करु शकणार?"

15) "धम्मासंबधीचे वादविवाद हुकूमशहा मिटवू शकणार नाही." ("The controversies regarding the path cannot be settled by a dictator.")

16) *"कोणत्याही वादाबद्दल संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे."* ("The decision of a controversy should be reached by the fraternity. The whole conjoint body should assemble and thrash out the matter till there is agreement, and then to settle it conformably with such agreement.")

17) "वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म