21. गौतमाचे शोकाकुल कुटुंब

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
21. गौतमाचे शोकाकुल कुटुंब
(The Family in Mourning)
***********************

1) शुद्धोदनाच्या कुटुंबातील सर्वजण छन्न परत येण्याची वाट पाहत होते. त्यांना आशा होती की, छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल.

2) राजाच्या अश्व शाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळविण्यासाठी मोठ्याने खिंकाळला.

3) राजाच्या अंतःपुराशी जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्याअर्थी घोडा कंठक खिंकाळत आहे त्याअर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा.

4) आणि दुःखाने मुर्च्छित झालेल्या स्रिया आनंदाने डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या; परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय त्यांना केवळ कंठक घोडाच दिसला.

5) गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मुर्च्छित झाली. आणि रडत असतानाच ती म्हणाली:

6) "जो आजानुबाहु आहे, ज्याची कंबर सिंहासारखी बारीक, डोळे बैलाच्या डोळ्यासारखे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुदुंभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे अशा वीरपुरुषाने वनातील अरण्यात रहावे काय?"

7) "असा सर्वगुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे."

8 ) "ज्या पावलांची बोटे सुंदर स्नायुंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायुंखाली लपलेले, नीलकमळासारख्या दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सकोमल दोन पावलांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल?"

9) "ज्याच्या शरीराला उंची वस्रे प्रावरणे, सुंगधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रासादाच्या गच्चीवर बसण्याची वा पहुडण्याची सवय, तो पौरुषसंपन्न देह अरण्यात थंडी, वारा व ऊन- पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळे असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल?"

10) "ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो; जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडे भिक्षा मागत कसा फिरु शकेल?"

11) "जो स्वच्छ सुवर्ण-शय्येवर झोपला असताना वाद्यवृंदांच्या नादमाधुर्यात ज्याला जागे केले जाते तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यांवर कसा काय झोपू शकेल?"

12) हा असा ह्रदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून, आपल्या डोळ्यांतून अश्रूधारा गाळीत होत्या.

13) नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्यास संमती दिली आहे हे विसरुन जाऊन अतिशय दुःखी अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले.

14) "मी त्यांची धर्मपत्नी(lawful wife) असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करुन मागे ठेवले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीन करावयास पाहिजे होते"

15) "मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा की, माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये."

16) "विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहावयास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय?"

17) "त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठूर! त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर. शत्रुलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोण सोडून जाईल?"

18) "माझे ह्रदय खरोखर मोठे कठोर आहे. होय, अगदी दगडाचे किवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण त्या ह्रदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखे आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या ह्रदयाला तडा गेला नाही. पण मी काय करु? आता मला हे दुःख सहनच होत नाही"

19) अशा तर्हेने दुःखभराने थकलेली यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीत तिच्या मर्यादेचा बांध फुटला होता.

20) अशा तर्हेने दुःखाने दिड्मूढ होऊन मोठमोठ्याने आंक्रदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठाल्या कमळांवर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तशा अश्रू़ंच्या नद्या त्यांच्या डोळ्यांतून चेहऱ्यांवर वाहू लागल्या.

21) छन्न आणि कंठक परत आले हे माहित झाल्यावर, आपल्या मुलाचा दृढनिश्चय समजताच दुःखी होऊन राजा शुद्धोदन धरणीवर पडला.

22) दुःखविव्हळ झालेल्या शुद्धोदनाला सेवकांनी सावरुन धरले. तेवढ्यात त्याने अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विव्हळून तो रडू लागला.

23) त्यानंतर शुद्धोदन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे प्रार्थना केली आणि विधी-अर्चा करुन आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली.

24) "देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू? अजून किती काळाने पुन्हा तो आम्हाला दिसेल?" असे म्हणत शुद्धोदन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली.


***********************
"प्रथम खंड, भाग पहिला समाप्त"
(Book I, Part I Completed)
***********************
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: भाग दुसरा - कायमचा संसारत्याग
१. कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म