2. 'तत्त्ववेत्ता कपिल'
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
The Buddha and His Predecessors
*********************
2. 'तत्त्ववेत्ता कपिल'
Kapila - The Philosopher
*************************
1) भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्त्यांत कपिल हा अग्रगण्य होता.
2) त्याचा तत्त्वज्ञानविषयक दृष्टीकोन अनन्य होता. आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाई.
3) त्याच्या विचारातील मूलतत्वांचे स्वरुप थक्क करुन टाकणारे होते.
4) सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही.
5) सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त दोन मार्ग मानले:
i) प्रत्यक्ष ज्ञान
ii)अनुमान.
6) प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन.
7) अनुमान तीन प्रकारचे आहेत:
i) कारणावरुन कार्य ओळखणे; जसे ढगांच्या अस्तित्वावरुन पावसाचे अनुमान काढणे.
ii) कार्यावरुन कारण ओळखणे; जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळाला पूर आल्यावरुन डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि
iii) साम्य; जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो, असे आपण अनुमान काढतो; त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहीजे.
8 ) त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण.
9) हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते, किंवा सुतापासून कापड तयार होते; त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व कारणात असते असे त्याचे मत होते.
10) विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय.
11) परंतु आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत.
12) असत् (non-existent) हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवतः नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सुष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरुपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरुपाचीच वस्तू तयार होऊ शकते. आणि काही विशिष्ट स्वरुपाच्या पदार्थापासून विशिष्ट स्वरुपाचा पदार्थ निर्माण होतो.
13) मग या इंद्रियगोचर विश्वाचे मूळ कोणते?
14) कपिल म्हणतो उत्क्रान्त वस्तू (व्यक्त) आणि अनुक्रांत (अव्यक्त) वस्तू यांनी हे इंद्रियगोचर विश्व बनले आहे. (empirical universe consists of things evolved and things that are not evolved)
15) व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाहीत.
16) व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो. आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरुप, त्याच्याशी तर हे विसंगत आहे.
17) सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते. आणि म्हणून कोणतीही एक वस्तू दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्याअर्थी त्या सर्व एखाद्या मूळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत.
18) नंतर कपिलाने असे विधान केले आहे की, जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे.
19) अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान कां होऊ शकत नाही, तिच्यायोगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रियगोचर कां होत नाही? याचे कपिलाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे:
20) "त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की, ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते, अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरुपामुळे त्या इंद्रियगोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे किंवा तत्सदृश पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकांचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील."
21) कपिलाला विचारण्यात आले, "मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो?"
22) कपिलाने उत्तर दिले, "व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंना ही कारण असते. पण दोघांचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते."
23) "व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रीय आणि एकसंघ असते."
24) कपिल म्हणतो की, अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया 'सत्व, रजस आणि तमस्' या तिच्या तीन घटकांमुळे घडत असते. यांना तीन गुण असे म्हणतात.
25) माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रियता व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो.
26 ) या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात. एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांत मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात.
२७) जेव्हा या तीन गुणांचा समतोल असतो आणि एक गुण दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन (static) दिसते व त्याची उत्क्रांती थांबलेली असते.
28) जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन (dynamic) होते आणि त्याची उत्क्रांती सुरु होते.
29) गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की, दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो.
30) कपिलाच्या तत्वज्ञानातील सिद्धांत हे असे होते.
31) सर्व तत्ववेत्यांपैंकी कपिल मुनींच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला होता.
32) ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे असा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले.
33) तथापि, कपिलाने सांगितलेल्या सर्वच गोष्टींचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्राह्य धरल्या.
34) सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले.
35) ईश्वर अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले.
36) जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले.









क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
३. ब्राह्मणे (i)
*********************
Comments
Post a Comment