2. विशाखेची दृढ श्रद्धा

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग चवथा- बुद्धांचे मित्र आणि प्रशंसक चाहते
Part IV- Friends and Admirers
*************************
2. विशाखेची दृढ श्रद्धा
The Abiding Faith of Visakha
*************************

1) अंग देशातील भद्दीय नगरीत विशाखा जन्मली होती.

2) तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते.

3) एकदा सेल ब्राम्हणाच्या निमंत्रणावरुन पुष्कळ भिक्खूंसह तथागत भद्दीय नगरीत गेले. विशाखा ही ह्या ब्राम्हणाची नात असून ती त्यावेळी सात वर्षांची होती.

4) जरी विशाखेचे वय केवळ सात वर्षांचे होते तरी तिने आपले आजोबा मेंडक यांच्याकडे तथागत बुद्धांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंडकाने तिला अनुज्ञा देऊन पाचशे सहचारिका, पाचशे दासी व पाचशे रथ सोबत देऊन बुद्धांच्या दर्शनासाठी तिला पाठवले.

5) आपला रथ काही अंतरावर थांबवून ती तथागत बुद्धांजवळ पायीच गेली.

6) तथागत बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली.

7) त्यानंतरच्या पंधरवड्यात मेंडकाने तथागत बुद्ध व त्यांचे अनुयायी ह्यांना दररोज आमंत्रित करुन भोजन दिले.

8). कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयला जेव्हा कोशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या मातापित्यासह गेली. आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले.

9) श्रावस्तीचा एक धनिक नागरिक आपला पुत्र पुण्यवर्धन ह्याचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरुप वधुच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते.

10) हे लोक फिरत साकेतला येऊन पोहोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरात स्नान करण्यास जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली.

11) त्यासमयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचारिणी आश्रयासाठी धावल्या. पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते, तेथे पोहोचली.

12) त्यांनी विचारले की, "तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस?" ती म्हणाली की, तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत. पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते.

13) तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखी भारावून गेली, त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला.

14) विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरविला गेला.

15) प्रसेनजितला जेव्हा समजले, तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शवली. धनंजयाने राजा व त्याचा परिवार, मिगार, पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी ह्यांचे भव्य स्वागत केले. आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले.

16) वधुचे अलंकार करण्यासाठी पाचशे सुवर्णकारांची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाहाप्रीत्यर्थ धनाच्या पाचशे गाड्या, सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादिकांच्या पाचशे गाड्या अशा अर्पण केल्या.

17) जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला, तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला दहा सूचना सागितल्या, ज्या पलिकडच्या खोलीत असलेल्या मिगारानेही ऐकल्या. ह्या सूचना अशा होत्या: घरातील अग्नी बाहेर न देणे, बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे, जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे, जो कोणी काही देणार नाही त्याला काही न देणे, जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे, पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि गृहदेवतांना आदर दर्शविणे.

18) दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ आठ गृहस्थांची नियुक्ती केली. तिच्यावर कसला आरोप आला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते.

19) आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी, अशी मिगाराची इच्छा होती. आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला. पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या.

20) मिगार निगण्ठाचा उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगण्ठांना पाचारण केले आणि त्यांचे स्वागत तिला करण्यास सांगितले. पण त्यांची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले.

21) निगण्ठांनी हट्ट धरला की, तिला परत पाठवून द्यावे. पण मिगाराने कालहरण करण्याचे योजिले.

22) एके दिवशी मिगार भोजनास बसला होता. व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले. मिगाराची त्यांच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली. पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरु ठेवले.

23) हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली, "कृपा करुन पुढे जा. माझे सासरे शिळे अन्न खातात." मिगाराला राग आला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली. पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचासमोर मांडण्याचे मान्य केले.

24) त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरविले.

25) त्यावर विशाखाने आज्ञा दिली की, तिला माहेरी पाठविण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार ह्यांना आमंत्रण दिले जावे, अशी अट घालून विशाखेने त्यांना क्षमा केली.

26) त्यांनी तसे केले. पण निगण्ठांच्या दडपणामुळे सरबराई करण्याचे काम त्यांनी विशाखेवर सोपविले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे तथागत बुद्धांचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्यास मान्यता दिली.

27) पण प्रवचनाचा प्रभाव त्याच्यावर एवढा पडला की तो उपासक बनला.

28) विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. त्यानंतर तो तिला मातेसमान मानू लागला. आणि त्याप्रमाणे तिचा आदरसत्कार करु लागला. नंतर तिला मिगारमाता असे संबोधण्यात येऊ लागले.

29) अशा रीतीची विशाखेची दृढ श्रद्धा होती.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म