2. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?
*************************
2. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे
Belief in Ishwara (God) is Not Essentially Part of Dhamma
************************

1) हे जग कोणी निर्माण केले? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे.

2) ब्राम्हणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रम्ह, महाब्रम्ह इत्यादी नावे आहेत.

3) हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही.

4) जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तीमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ म्हणजे जो सर्वकाही जाणतो, असे करतात.

5) ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर न्यायी, आणि दयाळू आहे.

6) तथागत बुद्धांनी ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे.

7) उत्तर आहे "नाही." त्यांनी स्वीकार केलेला नाही.

8). अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही.

9) कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात.

10) ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे.

11) कोणीही असे सिद्ध करु शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. (The world has evolved and is not created.)

12) ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही.

13) तथागत म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रीत धर्म आहेत. (a religion based on God is based on speculation.)

14) म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही.

15) त्यांचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. (creating superstition)

16) तथागत बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नांच्या विविध पैलूंचा विचार केला आहे.

17) ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक कारणे आहेत.

18) त्यांनी असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही.

19) हा विचार त्यांनी वासेट्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राम्हणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे.

20) वासेट्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला.

21) या समयी तथागत आपल्या महान भिक्खुसंघासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकट नावाच्या ब्राम्हणगावी अकिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते.

22) वासेट्ठ आणि भारद्वाज दोघेही मानसकट गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की, तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत; तेव्हा ते त्यांच्याकडे गेले. आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टीकोन निवेदन केला.

23) भारद्वाज म्हणाला, "तरुक्ख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे; आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो."

24) वासेट्ठ बोलला, "हे गौतम! पुष्कळसे ब्राम्हण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अध्वर्यू ब्राम्हण, तैत्तिरिय ब्राम्हण, कंछोक ब्राम्हण, त्याचप्रमाणे भीहुवर्गीय ब्राम्हण हे प्रत्येक जण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रम्हसायुज्य मिळते असे म्हणतात."

25) "ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहचवितात. त्याप्रमाणेच या ब्राम्हणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात."

26) भगवान बुद्धांनी त्याला विचारले, "वासेट्ठ, तुझे म्हणणे असे आहे काय? की, सर्वच मार्ग बरोबर आहेत?" वासेट्ठ बोलला, "श्रमण गौतम! होय, हेच माझे म्हणणे आहे."

27) "पण वासेट्ठ, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांपैकी एकाने ब्रम्हाचे साक्षात् समोरासमोर दर्शन घेतले आहे काय?"

28) "नाही. गौतमा, खरंच नाही."

29) "ह्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांच्या गुरूने तरी ब्रम्हाला समोरासमोर पाहिले आहे काय?"

30) "नाही, गौतमा. नाही."

31) "कोणीही ब्रम्ह पाहिलेले नाही, कोणालाही ब्रम्हसाक्षात्कार झाला नाही."
वासेट्ठ बोलला, "होय, असेच आहे."
"तर मग तू असे कसे मानतोस की, हे जे ब्राम्हण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे?"

32) "वासेट्ठ, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची रांग असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही. त्याप्रमाणेच मला वाटते, ह्या ब्राम्हणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही. मध्यभागी असणाराला दिसत नाही. अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. ह्या ब्राम्हणांचे शब्द उपहासास्पद आहेत; ते केवळ पोकळ, व्यर्थ शब्द असून त्यांत काही अर्थ नाही."

33) "वासेट्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय?"
"हो, तशीच आहे." वासेट्ठाने उत्तर दिले.

34) "वासेट्ठ, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, "मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस, आणि जिची तू वांछा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय आहे, ब्राम्हण आहे, की वैश्य आहे, की शुद्र आहे?"

35) सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रम्ह याच्या उत्पतीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेट्ठ यांना उद्देशून म्हणाले: "मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो: मी ब्रम्ह आहे, महाब्रम्ह आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे; आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत."

36) "याचा अर्थ असा की, जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रम्ह हा पिता आहे."

37) तुझे म्हणणे असे आहे की, "पूज्य, विजेता, अपराभूत, जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पती झाली असा जो ब्रम्ह, तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे. तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्रम्हाने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो?"

38) ह्या प्रश्नाला वासेट्ठाजवळ उत्तर नव्हते.

39) तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तीमत्तेसंबंधी होता. "जर ईश्वर सर्वशक्तीमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्यप्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही, असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे, तर ब्रम्ह्याने माणसाला निर्माणच का केले?"

40) यालाही वासेट्ठाजवळ उत्तर नव्हते.

41) तथागताचा चवथा विचार असा होता की, "जर ईश्वर शिवस्वरुप (कल्याणकारी) आहे, तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे?"

42) तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता.

43) "जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो?" असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, "ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणे दृश्य दृष्टीस पडेल. ब्रम्ह आपली रचना का सुधारीत नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल, तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वाना का सुख देत नाही? अफरातफरी, चोरी, अज्ञान का फैलावत असते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रम्हा परम अन्यायी ठरतो."

44) "सर्व प्राणिमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणिमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा."

45) तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की, ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही.

46) तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही. ते माणसामाणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे.

47) तथागत ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाविरूद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते.

48) तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. या विरूद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते. आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील महत्त्वाच्या तत्त्वाच्या म्हणजेच सम्मादिठ्ठीच्या शत्रू आहेत. (भ्रामक समजुती सम्यक दृष्टीसाठी हानिकारक आहेत.)

49) तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरूरीतून पुरोहितपद उत्पन्न होते. आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की, तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिठ्ठीचा विकास अशक्य होतो.

50) ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते पण ते बव्हंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की, ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते.

51) तथापि अशी मात्र कल्पना करू नये की, मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की, तो निःसंदेह ईश्वरावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे.

52) ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा महत्वाचा प्रश्न नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही, हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की, निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली? ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे.

53) महत्वाचा प्रश्न हा आहे की, ईश्वराने सृष्टी काही पदार्थातून उत्पन्न केली की अभावातून (something out of nothing) निर्माण केली?

54) "काही तरी" हे "काहीच नाही" मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही.

55) जर तथाकथित ईश्वराने 'काही तरी' हे 'काही तरी' मधून निर्मिले असे म्हटले तर, ज्या 'काही तरी'तून नवे 'काही तरी' निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या 'काही तरी' चा निर्माता म्हणता येणार नाही.

56) जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी 'कोणी तरी' 'काही तरी' निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही.

57) ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा शेवटचा असा हा निर्विवाद विचार होता.

58) ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो धम्म नाही. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म