2. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
Conversion of the Fallen and the Criminals
*************************
2. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा
Conversion of Angulimala, the Robber
*************************

1) कोशल देशाचा पसेनदी (प्रसेनजित ) नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आडदांड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे. त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती; नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते.

2) ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले.

3 ) एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहात असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुशीविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर त्यांनी आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चीवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले.

4) ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, "श्रमण, त्या वाटेने जाऊ नका! त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल."

5) "दहा, वीस, तीस, इतकेच नव्हे तर चाळीस माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जत्था त्या डाकूच्या हाती सापडतो." परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले.

6) दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना इशारा दिला. तरीदेखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले.

7) काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे चाळीस पन्नास प्रवाश्यांचा जत्था देखील त्याच्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले; आणि 'या तपस्व्याला' ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल-तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला.

8) *तथागत जरी आपल्या नेहमीच्याच चालीने चालत होते, तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही.*

9) तो विचार करू लागला की, "ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरीण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही!" म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने तथागतांना थांबण्यास सांगितले.

10) दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, "अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही (The good in you is not yet dead). जर तुझ्यातील चांगुलपणाला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल."

11) भगवंतांच्या शब्दांनी भारावून जाऊन तो म्हणाला, *"अरेरे, या ऋषीने माझा माग काढलाच."*

12) त्याने उत्तर दिले, "आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे."

13) स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंतांचे पाय धरून संघप्रवेशाची इच्छा व्यक्त केली.

14) देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, "हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये." आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला.

15) आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन तथागत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले.

--त्याचवेळी *राजा पसेनदीच्या* अन्तःप्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि, "आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करीत आहे, जखमी करीत आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, त्याचा निःपात करा," असे तो लोकांचा जमाव ओरडत होता. पसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले; पण त्यात त्यांना यश आले नाही.

16) एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारले, "राजा, काय झाले? मगधाच्या सेनीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय?"

17) "नाही भगवन्; तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निःपात करावयाचा आहे; पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे."

18) "राजा, मुंडन केलेला काषायवस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारीत नाही, जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील?"

19) "भगवन, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन, किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षितेची व्यवस्था करीन. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय?"

20) त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, "राजा, हा पहा अंगुलीमाल!"

21) हे ऐकताच राजा भयाने निःशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस न् केस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, "भिऊ नकोस, राजा. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही."

22) त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थविर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला, "आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय?"
"होय, महाराज!"

23) "महाशय, आपल्या पित्याचे कूळ कोणते होते (family)? आणि आपल्या मातेचे कोणते?"
"माझ्या पित्याचे कूळ गार्ग्य (Gagga) होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी (मैत्रायणी, Mantani) होते."

24) "गार्ग्य, मैत्रायणीपुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन."

25) परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व टाकून दिलेल्या वस्त्रांची तीनपेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले.

26) नंतर राजा भगवंतांच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, "आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंतांची केवढी ही किमया! हा असा पुरुष आहे, ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही; परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले! भगवंत, मला आता गेलेच पाहिजे. कारण बरीच कामे मला अद्याप उरकावयाची आहेत."

27) "राजन्, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या." नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने तथागतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला.

28) एके दिवशी चीवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला; तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली. आणि तशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, "हे सगळे सहन कर. हे सगळे सहन कर."

29) याप्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक सत्पुरुष (righteous man) बनला.

30) मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, "ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती, तो आता आस्था दाखवू लागतो; आपले पूर्वजीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धांना शरण जातो तो चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो."

31) "माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाचे अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा."

32) "स्वतःला 'अंगुलीमाल' म्हणवून व प्रवाहपतित होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला, जमिनीवर आणले. 'अंगुलीमाल' म्हणून मी रक्ताने माखलेला होतो; आता माझा उद्धार झाला आहे."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म