2. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
*************************
2. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा
Conversion of the Kassyapas
*************************
1) वाराणसीमध्ये (Benaras) काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते. या कुटुंबात तीन पुत्र होते. ते उच्च विद्याविभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते.
2) काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि ऊरूवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला.
3) त्याच्या धाकट्या दोन भावांनी त्याचे अनुकरण केले आणि ते ही संन्यासी बनले.
4) ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना 'जटील' असे म्हणत.
5) हे तीन भाऊ ऊरूवेला काश्यप, नदी काश्यप (निरांजना नदीचा काश्यप) आणि गया काश्यप (गया या गावाचा काश्यप) या नावाने ओळखले जात.
6) यापैकी ऊरूवेला काश्यप यांचे पाचशे जटील अनुयायी होते. नदी काश्यपाचे तीनशे जटील शिष्य होते आणि गया काश्यपाचे दोनशे जटील अनुयायी होते. ऊरवेला काश्यप या सर्वांचा प्रमुख होता.
7) उरूवेला काश्यपाची किर्ती फार दूरवर पसरलेली होती; जो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीच्या काठावरील त्याच्या आश्रमात येत असत.
8) उरुवेला काश्यपाचे नाव आणि किर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला.
9) त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे गेले.
10) तथागतांनी त्याची भेट घेतली. आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, "काश्यप जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या."
11) काश्यप म्हणाला, "आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक क्रूर "नागराजा" आहे. तो भयंकर शक्तीमान आहे. अग्नीपुजा करणाऱ्या सर्व संन्याश्यांचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देतो तसाच तो आपणाला त्रास देईल असे मला वाटते."
12) नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते. परंतु तथागतांना ते माहीत होते.
13) म्हणून तथागत पुन्हा विनंती करत म्हणाले, "तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत (fire room) मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या."
14) काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करु लागले.
15) नंतर काश्यप म्हणाला, "वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करु शकता."
16) तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले.
17) नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला. परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले.
18) तथागत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुचलिंदाला वाटले की, आपण एका महान विभूतीच्या सान्निध्यात आलो आहोत. आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करु लागला.
19) आपल्या अभ्यगताचे काय झाले असेल या काळजीने ग्रस्त झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुदा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भितभित उठला.
20) सकाळी कश्यप आणि त्याचे एकूण एक अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून बुद्धांना काही दुखापत झालेली त्यांना दिसली नाही. उलट मुचलिंद तथागतांची पूजा करीत असल्याची योजना आढळली.
21) हे दृश्य पाहून काश्यपाला असे वाटले की, आपण एक महान चमत्कार पाहात आहोत.
22) या चमत्काराचा परिणाम होऊन कश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले.
23) तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले.
24) त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. कश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता; आणि तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल.
25) पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही; असे त्याला वाटले.
26) एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले. आणि त्यांनी कश्यपाला विचारले, "तुम्ही अर्हन्त आहात काय?"
27) "जर तुम्ही अर्हन्त नसाल तर या अग्नीहोत्रामुळे काय हित होणार आहे?"
28) काश्यप म्हणाला, "अर्हन्त होणे म्हणजे काय आहे हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करुन सांगाल का?"
29) नंतर तथागत काश्यपाला म्हणाले, "अष्टांग मार्गापासून परावृत्त करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अर्हन्त. अग्नीहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही."
30) काश्यप हा एक अहंमन्य पुरुष होता. परंतु तथागतांच्या विधानांतील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करुन आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करुन त्याने हे मान्य केले की, जगद्वंद्य तथागतांच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही.
31) आणि अखेर खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने तथागतांचा सिद्धांत मान्य करुन उरुवेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला.
32) गुरुला अनुसरुन काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्यांचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णतः दीक्षा देण्यात आली.
33) नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरुन तरंगत खाली वाहत गेल्या.
34) प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहात असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादि सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहून येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले, "या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत. त्याने त्या कां फेकून दिल्या? काही तरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे." ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले.
35) त्याला व त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धांच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला काश्यपाने त्यांना सांगितली.
36) "आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्यांचे अनुकरण केले पाहिजे," असा त्यांनी विचार केला.
37) त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या दोन भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी तथागतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले.
38) तेथे जमलेल्या लोकांना दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, "लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नि बाहेर पडतो, तसा विचाराच्या गोंधळामुळे अग्नि निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो."
39) "काम, क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील सर्व चांगल्या गोष्टींना भस्मसात करतात; व त्यामुळे दुःख निर्माण होते."
40) "एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की त्याच्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो."
41) "म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की, तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो."
42) तथागतांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महान ऋषींचा अग्निपुजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि तथागतांचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
43) काश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता. कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता.
Comments
Post a Comment