2. पुनर्जन्म कशाचा ?

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
*************************
एक- पुनर्जन्म
Section I- Rebirth
*************************
2. पुनर्जन्म कशाचा ?
Rebirth of What?
************************

1) तथागत बुद्ध पुनर्जन्म मानतात काय?

2) याचे उत्तर "होय" असे आहे.

3) या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल: (१) पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि (२) पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा?

4) या दोन प्रश्नांचा एकेक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल.

5) पुनर्जन्म कशाचा? या प्रश्नाचा प्रथम विचार करू या.

6) या प्रश्नाकडे बहुधा नेहमीच दुर्लक्ष केले जाते. *हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे.*

7) तथागत बुद्धांच्या मते माणसाच्या शारीरिक अस्तित्वाचे चार घटक पदार्थ (elements of Existence) आहेत:
(१) पृथ्वी, (२) आप, (३) तेज, (४) वायू.

8). प्रश्न असा आहे की, मनुष्यदेह मृत झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात, 'होय'.

9) तथागत म्हणतात, 'नाही.' ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात.

10) जेव्हा तरंगणाऱ्या, इतरत्र पसरलेल्या समुहातून (Mass) हे चार घटक एकत्र मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो.

11) पुनर्जन्माचा तथागतांना अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे.

12) या नव्या जन्मातील घटक (elements) पूर्वीच्या एकाच विशिष्ट मृत शरीरातील असण्याची आवश्यकता नाही, आणि तसेही ते नसतात. ते वेगवेगळ्या मृत शरीरातून अवकाशात मिसळले असतील.

13) इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात.

14) अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात.

15) सारीपुत्त आणि महाकोठ्ठित यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे.

16) असे म्हणतात की, एकदा तथागत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असता महाकोठ्ठित आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले.

17) खालील प्रश्न त्यांपैकी होते.

18) महाकोठ्ठित: "ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात?"

19) सारीपुत्त: "पाच दूर केल्या जातात; पाच मागे राखल्या जातात. विषय-वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राखल्या जातात."

20) महाकोठ्ठित: "डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेन्द्रिये घ्या. त्यांचे विषय स्वतंत्र आणि क्षेत्रे वेगवेगळी आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की, त्यांचे अंतिम अधिष्ठान (ultimate base) कोणते? या पंचेन्द्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण?"

21) सारीपुत्त : "मन." (Mind)

22) महाकोठ्ठित : "ही पंचेन्द्रिये कशावर अवंलबून आहेत?"

23) सारीपुत्त: "चेतनेवर." (Vitality).

24) महाकोठ्ठित: "चेतना कशावर अवलंबून असते?"

25) सारीपुत्त: "उष्णतेवर." (Heat)

26) महाकोठ्ठित: "उष्णता कशावर अवंलबून असते?"

27) सारीपुत्त : "चेतनेवर."

28) महाकोठ्ठित : "तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा?"

29) सारीपुत्त : "मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणेच चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्त्वे अन्योन्याश्रयी आहेत."

30) महाकोठ्ठित : "शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात?"

31) सारीपुत्त : "चेतना, उष्णता आणि विज्ञान (जाणीव, consciousness)."

32) महाकोठ्ठित : "इंद्रिय, संज्ञा आणि भाव-भावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय?"

33) सारीपुत्त : "मृत शरीरात काया, वाचा आणि मन ह्यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात असे नसून, इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलटपक्षी, ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रियशक्ती शाबूत असते, जरी त्याचे श्वासोच्छ्वास, निरीक्षण, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी."

34) वरील विवेचन हे मृत्यू अथवा उच्छेद (Death or Annihilation) यांचे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे.

35) या संवादात केवळ एकच त्रुटी आहे. महाकोठ्ठित्ताने सारीपुत्ताला एक प्रश्न विचारावयाला हवा होता, तो म्हणजे 'उष्णता म्हणजे काय?'

36) याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निःस्संदेह आहे की, उष्णता म्हणजे शक्ती (Energy).

37) अशा रीतीने स्पष्ट केल्यास, 'शरीर मृत झाल्यावर काय होते?' या प्रश्नाचे योग्य उत्तर 'शरीर शक्ती (Energy) उत्पन्न करण्याचे थांबविते' असे होते. (The body ceases to produce energy.)

38) परंतु हा ही उत्तराचा एकच भाग ठरतो. कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की, शरीरातून जी शक्ती (energy) बाहेर पडते ती विश्वात संचार करणा-या शक्तिसमूहात मिळून जाते.

39) म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे (Energy) उत्पादन थांबणे. दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणा-या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे.

40) उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने तथागत स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटका (Matter) बाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते.

41) असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्दछेवादी का म्हणवून घेत नसत हे कळणे सोपे होते. *ते शरीर घटकांचे (Matter) पुनर्जीवन मानतात; बुद्ध आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाहीत.*

42) तथागत बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावला तर तो विज्ञानाशी (science) सुसंगत आहे.

43) केवळ याच अर्थाने बुद्ध पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल.

44) विज्ञान म्हणते, शक्ती (Energy) कधीही नाश पावत नाही.
तथापि, 'मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही' ही विचारसरणी विज्ञानाविरुद्ध आहे. कारण ह्या विचारसरणीनुसार शक्तीचे विश्वातील आकारमान/प्रमाण स्थिर नाही.

45) ही पुनर्जन्माविषयीची दुविधा व कोंडी केवळ याच रीतीने सोडविता येते.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म