2. संघप्रवेश

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पहिला- संघ
Part I- The Sangh
*************************
2. संघप्रवेश
Admission to The Sangh
*************************

1) संघात कोणालाही प्रवेश मिळे.

2) त्याला जातीचे बंधन नसे.

3) त्यांत पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती.

4) संघप्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे.

5) संघात जातीला स्थान नव्हते.

6) संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च-नीच असा भेद पाळला जात नसे.

7) संघात सर्व समान मानले जात असत.

8). संघामध्ये माणसांचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे; कुळावर नसे.

9) बुद्ध म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

10) नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात.

11) परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते.

12) ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते.

13) संघाचीही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो.

14) त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कूळ ही लोप पावतात असे तथागत म्हणत.

15) संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक: भिक्खू संघ आणि भिक्खूणी संघ, ह्या दोन वेगळ्या संस्था असत.

16) संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात.

17) वीस वर्षांखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई.

18) त्रिशरण आणि दशशीला ग्रहण केलेला प्रत्येक व्यक्ती श्रामणेर बने.

19) 'त्रिशरण' म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे.

20) 'दशशीला' म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रम्हचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही.

21) मी अवेळी अन्नसेवन करणार नाही. मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही. मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही. मी ऐषआरामापासून दूर राहीन. मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही.

22) अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत.

23) श्रामणेराला कधीही संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिव्रज्या घेतलेली नसे.

24) *भिक्खू व्हायला दोन अवस्थांतून जावे लागे; पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा.* उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे.

25) ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्यायपदाचा अधिकार असे त्यांच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून दहा वर्षें घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे.

26) उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागत होते.

27) हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे.

28) जो भिक्खूपदाचा प्रार्थी आहे, तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही. याची खात्री संघाला करून घ्यावी लागत असे. ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत.

29) जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खूपद मिळे.

30) भिक्खूणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम साधारणतः भिक्खूसंघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म