2. गृहस्थासाठी विनय
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
2. गृहस्थासाठी विनय
Vinaya for the Householder
*************************
1) एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनातील निवासात जेथे खारींना दाणे देतात तेथे विहार करीत होते.
2) त्यावेळी एका गृहस्थाचा *सिगाल* नावाचा तरुण पुत्र प्रातःकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, उर्ध्व, अधर अशा रीतीने आकाश-पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला.
3) त्याच वेळी सकाळी भगवंतानी चीवर परिधान करुन, चीवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. अष्टदिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, *"तू अष्टदिशांची पूजा का करीत आहेस?"*
4) त्यावर सिगालने उत्तर दिले, "माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, "मुला, तू आ्काश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा." वडीलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी, भगवान, मी अशा रीतीने पूजा करीत आहे."
5) तथागतांनी त्याला विचारले, *"व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो?"* सिगालने उत्तर दिले, "याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार? आणि जर असेल तर तो तथागतांनी मला सांगावा."
6) *"तरुण गृहस्था, नीट ऐक; मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो."* तरुण सिगाल म्हणाला, "ठिक आहे." मग भगवंत म्हणाले:
7) "माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. *जीवहत्या करणे, न दिलेले बलात्काराने घेणे, व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे,* हे चार दुर्गूण त्याने टाळले पाहिजेत." (A religion, to be a religion of man, must teach him to shun bad conduct.)
8). "सिगाला, हे लक्षात ठेव की, पापकर्मे ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यांमुळे घडतात. यांपैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही."
9) "माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करु नये असे शिकवले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरुन भटकत राहणे, जत्रांतून भ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, वाईट मित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे, यांमुळे संपत्तीची धूळधाण होते."
10) "मद्यपानाच्या सवयीने *सहा प्रकारची संकटे* उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धीनाश ही ती सहा संकटे होत."
11) "अवेळी रस्यावर भटकण्याने माणूस *सहा प्रकारच्या संकटात पडतो.* ती म्हणजे तो स्वतः, त्याची बायकामुले, कुटुंब आणि त्याची मालमत्ता ही अरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही, त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो."
12) "जत्रेत भटकल्याने तो *सहा प्रकारच्या संकटांत* सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की, नाचणे, गाणे, बजावणे, काव्य गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का?"
13) "जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी *सहा संकटे* म्हणजे, खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात, हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो. त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही, त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात. लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. कारण लोक म्हणतात, जुगाऱ्याला बायकोचे पालनपोषण कसचे करता येणार?"
14) "कुसंगतीने *सहा प्रकारची संकटे* ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी, व्यभिचारी, दारुबाज, लबाड, पैसेखाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते."
15) "आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी *सहा संकटे* म्हणजे, तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला, म्हणून मी काम करीत नाही; तो म्हणतो, फार भूक लागली आहे म्हणून मी काम करीत नाही, तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून मी काम करीत नाही. आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते."
16) "व्यवहारी माणसाच्या धर्माने *खऱ्या मित्राची पारख* करण्यास त्याला शिकवले पाहिजे."
17) "मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुत: *शत्रू असणारे* असे *चार प्रकारचे लोक* आहेत. लोभी मनुष्य, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा मनुष्य, खुशामत्या मनुष्य आणि उधळ्या वृत्तीचा मनुष्य."
18) "यापैकी *पहिल्या प्रकारचा मनुष्य* बाहेरून मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रूसारखाच वागतो. कारण तो थोडे देतो व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो. परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो."
19) "जो *बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य* कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो."
20) *"खुशामती मनुष्य* मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्ये करण्यास संमती देतो आणि सत्कृत्य त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो."
21) "त्याप्रमाणेच *उधळ्या सोबती* मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हांला सोबत करतो. नाच-तमाशा पाहताना तो तुम्हांला सोबत करतो. तुम्ही द्यूतक्रीडेत, जुगारात मग्न झाला असता तुम्हांला सोबत करतो."
22) *"मन:पूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात:-* सहाय्यक, सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा."
23) *"सहाय्यक हा खरा मित्र मानावा.* कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की, तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हांला दुपटीने पुरवितो."
24) *"सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा.* कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणींत तुमचा त्याग करीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो."
25) *"तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा.* कारण तो तुम्हाला दुष्कृत्यांपासून परावृत्त करतो. सतकृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो."
26) *"तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा.* कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो. सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो," असे भगवंत म्हणाले.
27) जो धर्म *मानवधर्म आहे* तो मानवाला षडदिशांची पूजा करण्याऐवजी *आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो.*
**********
याविषयीचे बुद्धांचे विचार सिगालासोबतचे त्यांचे संभाषण व त्याला दिलेल्या प्रवचनात आढळून येतात. (सिगालोवाद सुत्त)
Comments
Post a Comment