3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?
*************************
3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे.
To Live in Nibbana is Dhamma
**************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?
*************************
3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे.
To Live in Nibbana is Dhamma
**************************
1) *"निब्बाणासारखे खरे सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही," असे बुद्धांनी सांगितले आहे.*
2) भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा *केंद्रवर्ती सिद्धांत* आहे.
3) निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे.
4) बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानीत असत.
5) *चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे.* (1) पहिला लौकिक- म्हणजे खा-प्या, मजा करा, या जड-स्वरुपाचा; (2) दुसरा यौगिक; (3) तिसरा ब्राम्हणी आणि (4) चौथा उपनिषदिक.
6) ब्राम्हणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनांत आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे, असे मानले जाई. *भगवान बुद्धाने हा सिद्धांत नाकारला आहे.* म्हणून निब्बाणविषयक ब्राम्हणी आणि औपनिषदिक शिकवणूक नाकारणे भगवान बुद्धांना कठीण गेले नाही.
7) निब्बाणाची लौकिक-कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची, भौतिकवादी (materialistic) असल्यामुळे भगवान बुद्धांस ती कधीच पटली नव्हती. कारण या लौकिक-कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून जी ऐंद्रिय भूक (animal appetites) गरजा असतात, त्यांचे शमन करणे, ह्यापलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते.
8) असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे *बुद्धांच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे.*
9) कारण ऐंद्रिय भूक/शारिरीक गरजांचे अधिक शमन करणे म्हणजे अधिक भूक निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने मिळणाऱ्या सुखामुळे अधिक दुःख निश्चितपणे निर्माण होते.
10) योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी व्यवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरुपाचे होते, आणि ते मिळविण्यासाठी सर्व संसार-पराङमुख व्हावे लागते. त्यांच्या योगाने वेदना टाळता येतात; परंतु सुख मिळत नाही, आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरुपाचे नव्हते. अस्थायी स्वरुपाचे होते.
11) भगवान बुद्धांची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती.
12) त्यांच्या निब्बाण कल्पनेत *तीन विचारांचा, संकल्पनांचा* अंतर्भाव होतो.
13) *आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख* हा एक विचार.
14) *जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख* हा निब्बाणाचा दुसरा विचार.
आत्म्याची संकल्पना आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुद्धांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत.
15) भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे "सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे."
16) गयेत राहात असताना बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय *राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत* हा आहे. बुद्धांनी सांगितले:
17) "भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत?"
18) "भिक्खूंनो! चक्षुरिंद्रिय, डोळे हे पेटलेले आहे. दृश्य, विविध रुपे हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव (चक्षुसंस्कार) ही पेटलेली आहे. चक्षुसंस्कारापासून उद्भवणा-या सुखकारक, दुःखकारक, अदु:खकारक गोष्टी ह्याही जळत आहेत."
19) "आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत?"
20) "त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दु:ख, दौर्मनस्य त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत."
21) "भिक्खूंनो! कान जळत आहे. शब्द जळत आहे. घ्राणेंद्रिय जळत आहे. गंध जळत आहे. जिव्हा जळत आहे. रस जळत आहे. शरीर जळत आहे. चित्तातील संकल्प-विकल्प जळत आहेत. चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत."
22) "आणि ह्या कशामुळे जळत आहेत?"
23) "त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख आणि निराशा यांच्यामुळे जळत आहेत."
24) "हे जाणल्यावर, भिक्षूंनो! प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा (विरक्ती) उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी, लोभ, आदि विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते."
25) निब्बाणामुळे सुख कसे मिळते? या दुस-या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे.
26) एक सर्वसामान्य समजूत आहे की, माणसाला पुरेसे मिळाले नाही की, तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो.
27) हा लोभाचा परिणाम आहे, आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे.
28) हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे.
29) "लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात."
30) "परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवीत नाही."
31) "आणि असे झाले की, बंधूंनो! ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य-जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते."
32) माणसाला दग्ध करणारे आणि त्याचे सुख घालवणारे असे, दुःखाचे मूळ कशात आहे, हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. *माणसांच्या राग-द्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे.*
(analogy of burning fire to the working of human passions)
33) राग-द्वेषाच्या आधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. *राग, द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाणस्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत.* ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो.
34) भगवान बुद्धांच्या मते ह्या *विकारांचे तीन प्रकारचे वर्ग* आहेत.
35) पहिल्या वर्गात *तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ* हे विकार येतात.
36) दुसऱ्या वर्गात *वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष* हे दोष येतात.
37) तिसऱ्या वर्गात *अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता* हे दोष येतात.
38) पहिल्या (राग) व दुसऱ्या (द्वेष) अग्नीचा संबंध भावना आणि इतरांसंबंधीचा दृष्टीकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी (मोह) हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे.
39) भगवान बुद्धांच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत.
40) निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ *फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे.*
41) या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन *टीकाकारांनी निब्बाणसिद्धांत अर्थहीन बनविला आहे.*
42) ते असे मानतात की, निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे, आणि ही क्रिया मृत्यूसमान आहे.
43) असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे.
44) *टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ भगवान बुद्धाला अभिप्रेत नव्हता.* हे जो कोणी अग्नी-प्रवचनाचा (अग्निस्कंधोपम सूक्ताचा) भाषादृष्टया अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल.
45) अग्निस्कंधोपम सूक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की, रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत.
46) सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्नीसूक्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की, पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका.
47) दुसरी गोष्ट अशी की, टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यांत भेद न करण्यात चुकले आहेत.
48) उदानात असे सांगितले आहे, *"जेव्हा शरीर नाश पावते, पाहाणे थांबते, संज्ञा नाहीशा होतात, चलन-वलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते.* परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे."
49) निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. *निब्बाण म्हणजे धम्ममार्गांवर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे.* (enough control over passion) यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता.
50) *निब्बाण हा निर्दोष, सदाचारी जीवनाला (righteous life) प्रतिशब्द आहे* हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे.
51) एकदा स्थविर राध तथागतांकडे गेला. तथागतांना आभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, "भगवान, निब्बाण म्हणजे काय?"
52) भगवंतांनी उत्तर दिले, *"निब्बाण म्हणजे तीव्र वासनांपासून मुक्त निर्दोष जीवन."* (release from passion)
53) "भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय?"
54) "राध, निर्दोष, सदाचारी जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे."
55) निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुद्धाने सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे:
56) एकदा भगवान *श्रावस्तीतील अनाथपिंडिकाच्या आश्रमात* वास करीत होते. सारीपुत्तही त्या वेळी त्या ठिकाणी राहात होता.
57) भिक्खूंना उद्देशून भगवन्त म्हणाले, *"भिक्षूंनो, ऐहिक संपदेऐवजी तुम्ही धम्माचे वारसदार व्हा.* तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हांला धम्मातील वाटा मिळावा, म्हणून मी तुम्हांला धम्माचे वारसदार बनवित आहे."
58) असे बोलून भगवान आपल्या कुटीत गेले.
59) सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.
60) तेव्हा सारीपुत्त म्हणाला, "लोभ, हाव हा दोष आहे. व्देष हा दोष आहे."
61). *"हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग, मध्यममार्ग होय.* हा मार्ग आपल्याला पहायला शिकवतो, दृष्टी देतो, जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांजकडे नेतो."
62) "हा मध्यममार्ग कोणता? *हा मध्यममार्ग म्हणजे महान अष्टांगमार्ग होय.* त्याशिवाय दुसरा नाही. (Noble Eightfold Path) *सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् प्रयत्न (व्यायाम), सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी.* भिक्खूंनो, हा *मध्यममार्ग* आहे."
63) "होय. क्रोध, द्वेष, ईर्षा, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद, हे सर्व दुष्ट विकार आहेत."
64) *"मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यममार्गाने होतो;* त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पहायला शिकवितो, दृष्टी आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधि आणि निब्बाण यांकडे नेतो."
65) *"निब्बाण हे दुसरे तिसरे काही नसून तो अष्टांगमार्ग आहे."*
66) अशा रीतीने सारिपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्खूंना ते ऐकून आनंद वाटला.
67) निब्बाणात जो मुलभूत विचार आहे तो म्हणजे *सदाचाराचा अष्टांगमार्ग.* अष्टाङ्गमार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही.
68) प्रवृतींचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन विरुद्ध टोके आहेत आणि *निब्बाण हा त्यांतील मध्यममार्ग आहे.*
(Complete annihilation is one extreme and Parinibbana is another extreme. Nibbana is the Middle Way)
69) हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निरास होईल.
Comments
Post a Comment