3. धम्मपरिवर्तन हे बळाने करावयाचे नाही

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग तिसरा- भिक्खूची कर्तव्ये
Part III- The Duties of The Bhikkhu
*************************
3. धम्मपरिवर्तन हे बळाने करावयाचे नाही
Conversion Not to be by Force
*************************

1) एकदा तथागत राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरुन जवळजवळ पाचशे भिक्खूसंह जात होते. त्या वेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू,ब्रम्हदत्त नावाचा आपल्या शिष्यासह त्यांच्या मार्गावरुन चालला होता.

2) परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ याची निंदा करीत होता. परंतु तरुण शिष्य ब्रम्हदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता.

3) अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्परविरोधी मतांचे प्रतिपालन करीत तथागत आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते.

4) तथागत रात्र होताच अंबलठ्ठीका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खूसंघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रम्हदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली.

5) पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता ते सुप्पीय आणि ब्रह्यदत्त ह्यांच्यामधील भाषणाची चर्चा करु लागले.

6) त्यांच्या संभाषणाचा रोख कोणाकडे आहे हे जाणताच तथागत सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, "तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे?" भिक्खूंनी सर्व सांगताच तथागत म्हणाले:-

7) "भिक्खूहो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्याविरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये."

8). "असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्यांच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्याविरुद्ध बोलतात त्या वेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य हे तुम्हाला कसे ठरविता येईल?"

9) भिक्खू म्हणाले, "तथागत आम्ही जर क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यायोग्यता आम्हाला ठरविता येणार नाही ही गोष्ट खरी आहे."

10) तथागत पुढे म्हणाले, "संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी, अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमूक अमूक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशारीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करुन सांगावे."

11) "भिक्खूहो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्या वेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका:-"

12) "प्रशंसा करणारा म्हणेल, 'हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो, त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जीवजातीसंबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे.' ज्याचे धम्मपरिवर्तन झाले नाही तो तथागतासंबंधी अशा प्रकारची प्रशंसा करण्याचा संभव आहे."

13) "किंवा तो म्हणेल, 'न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही हे व्रतपालन करणाऱ्या तथागतांनी लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि ह्रदयशुद्धीने व्यतीत करीत असतो."

14) "किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, 'व्यभिचाराचा त्याग करुन गौतम हे ब्रम्हचर्य पाळीत आहे. लैंगिक व अश्लील गोष्टींंपासून तो दूर राहतो."

15) "तो प्रशंसा करणारा असेही म्हणेल, 'श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही. खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही. तो सत्य बोलतो. सत्यापासून विचलित होत नाही. तो इमान राखतो. तो विश्वसनीय आहे. दिलेला शब्द तो मोडीत नाही."

16) "तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, 'श्रमण गौतम निंदाजनक शब्दही उच्चारीत नाही. निंदेचा त्यांनी त्याग केलेला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी तेथे बोलत नाही. अशा रीतीने जे विभागले गेले असतील त्यांना एकत्र आणण्यात व मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांतिनिर्माता, शांतताप्रेमी, शांततेची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असेच शब्द उच्चारणारा आहे."

17) "किंवा तो म्हणेल, 'श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाही. निर्दोष, सुश्राव्य, ललित, ह्रदयाला जाऊन भिडणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धींगत व्हावे असे शब्द तो बोलतो."

18) "अथवा तो म्हणेल, 'चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. ते योग्य वेळी बोलतात. सत्याला धरुन बोलतात. धम्म आणि संघ यावर ते समयोचित बोलतात. अंतःकरणात साठविण्यासारखे शब्द बोलतात. समुचित उदाहरणे देतात. भेद स्पष्ट करतात. मुद्याला धरुनच बोलतात."

19) "किंवा तो म्हणेल, 'श्रमण गौतम बीजे आणि रोप यांनासुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो. रात्री अथवा दुपारनंतर अन्न सेवन करीत नाही. फुलमाळा, सुंगंधी द्रव्ये आणि उटणे यांनी तो आपणाला विभुषित करीत नाही. लांबलचक उंच बिछान्यावर तो कधीच पहुडत नाही. सोने, रुपे तो कधी स्वीकारत नाही. न शिजवलेले अन्न तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारीत नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारीत नाही. तो दुताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही. तो क्रयविक्रय करीत नाही. लाचलुचपत, लांडीलबाडी ह्यांचा वाममार्ग तो आचरित नाही. तो कोणाला विद्रुप करीत नाही. कोणाचा खून करीत नाही. कोणाला कडी घालून बांधीत नाही. वाटमारे, दरोडे आणि मारहाण करीत नाही."

20) "भिक्खूहो, तथागतांची प्रशंसा करताना धर्मपरिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल. परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये. कारण असे घडणेदेखील तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी, धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केलेच पाहिजे, आणि म्हटले पाहिजे, "या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे. अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते हे अगदी बरोबर आहे."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म