3. जेव्हा धम्म 'करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे' असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग तीन- धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे
Section III
Dhamma to be Saddhamma must promote Maitri
*************************
3. जेव्हा धम्म 'करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे' असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते
Dhamma is Saddhamma only when it Teaches that More than Karuna what is Necessary is Maitri
***********************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग तीन- धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे
Section III
Dhamma to be Saddhamma must promote Maitri
*************************
3. जेव्हा धम्म 'करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे' असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते
Dhamma is Saddhamma only when it Teaches that More than Karuna what is Necessary is Maitri
***********************
1) भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाही.
2) करुणा म्हणजे प्राणिमात्रांसंबंधी दया. भगवान बुद्धांनी यापलीकडे जाऊन मैत्री शिकविली. "मैत्री म्हणजे अखिल जीव-जाती संबंधी प्रेम."
3) केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता, पुढे जाऊन अखिल जीव-जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे.
4) श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात तथागत बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.
5) मैत्रीसंबंधी बोलताना तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले,
6) "समजा, मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय?"
7) "नाही भगवान, नाही!" ते भिक्खू उत्तरले.
8). "समजा, एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला. तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हांला वाटते काय?"
9) "नाही, भगवान!"
10) "कां नाही?"
भिक्खू म्हणाले, "कारण हवेत असे काळे फलक नाहीत की, ज्यावर रंग भरता येईल."
11) "त्याप्रमाणेच तुमच्या मनातही किल्मिष असता कामा नये. कारण किल्मिषे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंब असतात."
12) "समजा, एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय?"
13) "नाही. नाही भगवान."
14) "कां नाही?"
"कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही."
15) आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, "ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे."
16) "भिक्खूंनो! मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुःसह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात."
17) "तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा."
18) "माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही; त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे."
19) या प्रवचनात भगवंतानी भिक्खूंना एक कथा सांगितली ती संस्मरणीय आहे.
20) पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती. कालीने स्वतःशी विचार केला, "माझ्या मालकिणीची ख्याती आहे की, तिला क्रोध असा येतच नाही; किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहात असावा. मी तिला कसोटी लावून पाहते."
21) "म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशीरा उठली. तिच्या मालकिणीने तिला हाक मारून विचारले, "तू इतक्या उशीरा का उठलीस?' मोलकरीण म्हणाली, "त्यात काय बाईसाहेब?" रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाली, "त्यात काही नाही काय? लबाड कुठली!"
22) "मोलकरणीने विचार केला, "राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर! ती दाखवित नाही एवढेच! मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन!" म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिणीने विचारले, "काले, तू उशीरा का उठलीस!" मोलकरणीने उत्तर दिले, "त्यात काय आहे?"
आपला राग आणि चीड शब्दांत व्यक्त करत मालकीण म्हणाली, "अस्सं! त्यात काही नाही काय? लबाड कुठली!"
23) "अस्सं तर," त्या मोलकरणीने विचार केला, "राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे; पण मी माझे काम नीट करते म्हणून ती तो दाखवित नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन." म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशीरा उठली. मालकिणीने तिला हाक मारून विचारले, "इतक्या उशीरा का उठलीस?" मोलकरणीने उत्तर दिले, "अं! त्यात काय आहे?"
24) "असं तर! इतक्या उशीरा उठणे म्हणजे काहीच नाही काय? लबाड मुली! असे उद्गार काढून मालकिणीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला."
25) "खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, "पाहा बाई माझी मालकीण! किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीण! हे एवढे कशासाठी! तर तिची एकुलती एक मोलकरीण उशीरा उठली म्हणून! ती इतकी रागावली, चिडली होती की, हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले!"
26) "याचा परिणाम असा झाला की, विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली."
27) "याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच, भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते."
28). ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, "केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूंनी मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री-भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री-भावना ही धम्म सिद्धान्तातून उगम पावते, त्यालाच मी खरा भिक्खू समजतो."
29). "पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये (to acquire religious merit) ही मैत्रीच्या (loving kindness) एका षोडशांशाच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता (loving kindness, which is freedom of heart). ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते."
30). "भिक्खूंनो, सर्व ता-यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक षोडशांशही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणांत सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशांशही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता; ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते."
31). "त्याप्रमाणेच, भिक्खूंनो! जसा वर्षोऋतूअखेर सूर्य स्वच्छ, निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किल्मिष नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलीत होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलीत होते."
Comments
Post a Comment