3.भाग२- धर्म आणि धम्म यांमधील इतर भेद तथागत आणि पोठ्ठपद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहेत

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग पहिला- बुद्धांचे त्यांच्या धम्मात स्थान
Part I- His Place in His Dhamma
*************************
3.भाग२- धर्म आणि धम्म यांमधील इतर भेद तथागत आणि पोठ्ठपद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहेत
The other differences between Religion and Dhamma are brought out in the discussion between the Blessed One and Potthapada
*************************

1) एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आश्रमात होते. त्यावेळी पोठ्ठपद नावाचा परिव्राजक, राणी मल्लिकेने तत्त्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता.

2) त्याच्याबरोबर त्याच्या तीनशे अनुयायांचा जत्था होता. भगवान आणि पोठ्ठपद या दोघांमधे एका प्रसंगी खालील संवाद घडून आला.

3) पोठ्ठपद म्हणाला, "जग शाश्वत आहे काय? आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मते चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय?"

4) "पोठ्ठपद, ह्या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही."

5) यानंतर पोठ्ठपदाने भगवंतांना खालील प्रश्न विचारले :
(अ). जग शाश्वत नाही काय?
(आ). जग सान्त आहे काय?
(इ). जग अनंत आहे काय?
(ई). आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय?
(उ). ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय?
(ऊ). त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय?
(ए). त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय ?
(ऐ). त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असेही नाही काय?

6) या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकच प्रकारचे उत्तर दिले.

7) "पोठ्ठपद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही."

8) "या विषयावर भगवंतांनी कां मत व्यक्त केलेले नाही?"

9) "कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही."

10) "मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे?"

11) "पोठ्ठपदा, मी दुःख म्हणजे काय? दुःखाचे कारण काय? दु:खाचा निरोध म्हणजे काय? आणि दु:खाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे."

12) "भगवंतांनी हे तरी कां स्पष्ट केले?"

13) "पोठ्ठपद, कारण त्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांगमार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते, म्हणूनच तर मी दुःख, दुःखकारण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे."

14) या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत.

15) धर्माचे प्रयोजन जगत्प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना हे आहेत.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म