3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
VI (सहा)- बुद्धांची सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने
SECTION SIX-- SERMONS ON SOCIO-POLITICAL QUESTIONS
*************************
3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते
It is the Social System on which Depends Political and Military Strength
***********************
1) एकदा तथागत राजगृह येथील गृध्रकूटावर राहात होते.
2) त्या वेळी विदेहीपुत्र मगधराजा अजातशत्रू वज्जींवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, "हे वज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन."
3) म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान, वस्सकार नावाचा ब्राम्हण याला बोलावून तो म्हणाला,
4) "हे ब्राम्हणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, "आपली प्रकृती ठीक आहे ना? आपणास स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य लाभत आहे ना?"
5) "नंतर त्यांना सांग की, मगधराजा अजातशत्रू वज्जींवर आक्रमक करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे."
6) *अजातशत्रु पुढे म्हणाला, "तथागत जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील. ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द न् शब्द मला निवेदन कर. कारण बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात."*
7) राजाचे शब्द ऐकून तो ब्राम्हण वस्सकार म्हणाला, "ठीक आहे." आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृध्रकूटाकडे निघाला.
8). तेथे पोहचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला.
9) त्या वेळी स्थविर आनंद तथागतांच्या मागे उभा होता. तथागत त्यास म्हणाले, *"आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय?"*
The Vajjins hold full and frequent public assemblies
10) आनंदाने उत्तर दिले, "होय भगवंत, मी ऐकले आहे."
11) यावर भगवंत पुढे म्हणाले, "आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. उलट त्यांची भरभराट होत राहील."
12) "आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्ये करतात,"
So long, Ananda, as the Vajjins meet together in concord, and rise in concord, and carry out their undertakings in concord.
13) "जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्वमान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजत नाहीत आणि गतकाळात वज्जीकुळाने जे नियम केले आहेत त्या नियम-परंपरेप्रमाणे आचरण करतात,"
14) "जोपर्यत ते वज्जी आपल्यामधील ज्येष्ठांना मान देतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात,"
15) "जोपर्यंत आपल्या कुळांतील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवीत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत,"
16) "जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात,"
17) *"तोपर्यंत, हे आनंदा, वज्जीकुळाची अधोगती होणार नाही. उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही."*
18) *"सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे तथागतांनी स्पष्ट केले."*
19) नंतर तथागत वस्सकाराला उद्देशून म्हणाले,
20) "हे ब्राम्हणा, मी वैशाली येथे वज्जीकुळात राहात असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले."
21) तेव्हा तो ब्राम्हण म्हणाला, "तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही मानायचे तर? हे गौतमा, मगधराजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते."
22) असे बोलून वस्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला बुद्धांचे शब्द सांगायला निघून गेला.
Comments
Post a Comment