3. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध)

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग दुसरा- कायमचा संसारत्याग
Renunciation Forever
*********************
3. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध)
*************************

 
1) याप्रमाणे मगध सम्राटाने (बिंबिसाराने) गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दांत उपदेश केला. परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र विचलित झाला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल, स्थिर राहिला.

2) मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता, खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढीलप्रमाणे उत्तर दिले:

3) "आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही. महाराज, सिंह ज्यांचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण मित्रांवर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे."

4) "दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव व मैत्री खंडित होते आणि विलयास जाते. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परपंरा निर्माण करुन पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात."

5) "आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करत नाहीत; त्यांनाच मी माझ्या अंतःकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो. वैभवशाली माणसाला भरभराटीचा, संपन्न काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही?"

6) "या जगात संपत्ती मिळाल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते. आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही"

7) "महाराज, माझ्याविषयीच्या आपल्या सुचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावनेने भेटेन. मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही."

8 ) "मला ह्या ऐहिक वस्तूंची जितकी भिती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही."

9) "आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे (transient pleasures) जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात (like illusions). त्यांची नुसती आशा केली तरीही माणसाची मने ती मोहून टाकतात, आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात."

10) "सुखाला (pleasures) बळी पडलेल्यांना स्वर्गात देखील आंनद मिळत नाही; आणि मानवाच्या जगात तर मुळीच आनंद मिळत नाही. वाऱ्याचा मित्र असलेला अग्नि ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे जो तृष्णार्त आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही."

11) "या जगात सुखासारखी (pleasures) दुसरी आपत्ती नाही. लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे जर समजले आणि असत्याची, वाईटाची भिती वाटू लागली, तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरेल?"

12) "समुद्रांनी वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही. तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही."

13) "मंधात्रीला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली. त्याने सर्व खंड जिंकले व शुक्राचे देखील अर्धे राज्य पादाक्रांत केले. तरीही त्याची ऐहिक पदार्थांविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती."

14) "इन्र्द जेव्हा वृत्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठया ऋषींना वहावयास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता."

15) "इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषिमुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील?"

16) "सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत, त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते."

17) "सुखप्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो. उन्मत्तपणामुळे जे करु नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही. आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधःपतनात होतो"

18) "कष्ट करुन मिळवून ठेवलेली, तुम्हाला फसवून जिथून आली तेथे परत जाणारी - व काही काळापुरती उसणी घेतलेली ही सुखे, या सुखांत कोणता आत्मसंयमी मनुष्य - तो जर शहाणा असेल तर - रममाण होईल?"

19) "ज्यांचा शोध करुन ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

20) "जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

21) "ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत, अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

22) "ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतलेला आहे अशा आत्मसंयमी पुरुषाचाही नाश होतो. त्यांना आंनद मिळत नाही. - संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

23) "हाड चघळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही. मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

24) "अशा सुखांच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे, जो कपाळकरंटा सुखोपभोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याला या जीवनसृष्टीत मृत्यूचे दु:ख भोगावे लागते."

25) "गाण्यावर लुब्ध होऊन हरिण स्वतःचा नाश ओढवून घेतात. तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून मासा लोखडांचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सुखे अंती दुःख निर्माण करतात."

26) "सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही सुख उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्रे आणि इतर सुखे म्हणजे वस्तूंचे केवळ सोबती (accessories of things) होत. - दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानले पाहिजे."

27) "तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते; त्याच प्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा, ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते; आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी-वारा यांपासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते."

28) "याचप्रमाणे झोपेची गुंगी, थकवा घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची स्वच्छता, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते."

29) "म्हणून बाह्य वस्तू म्हणजेच मानवाच्या दुःख निवारण्याची साधने होत. ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्याचा उपयोग केला जातो; अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आंनदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील?"

30) "पित्तप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे, शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना, तो त्या उपाययोजना म्हणजेच आंनदाचा उपभोग असे समजतो, तो सुखांना आनंद हे नाव देतो."

31) "ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते, त्या अर्थी मी आंनद हे नाव देऊ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे."

32) "भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात; परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात."

33) "सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा, या आणि इतर अनेक परस्परविरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे. म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही."

34) "सुख आणि दुःख यांचे स्वरुप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते, तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी मला सारख्याच वाटतात. राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो."

35) "राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्विकारणे होय; आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात. कारण राजा हा खुंटीसारखा आहे; -तो जगासाठी त्रास सहन करीत असतो."

36) "जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय आणि याउलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार."

37) "आणि संपूर्ण पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एका शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजेपद म्हणजेच केवळ इतरांसाठी केलेले कष्ट नव्हेत काय?"

38) "आणि राजपद स्विकारल्यावर सुद्धा वस्राच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते, आणि केवळ भूक शमवणे इतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढीच राजाला गरज असते. या खेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात."

39) "आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलाची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेल; आणि जर माणसाला एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत का?"

40 ) "म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की, सुखांना काही किंमत आहे काय?"

41) "मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे. किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे. किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करुन घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सुचना नाकारतो असे ही नाही."

42) "अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटवलेल्या गवताची चूड पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करील, असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल."

43) "डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल्यांचा हेवा करील, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाणा असून वेड्याचा हेवा करील, तोच - मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करील."

44) "माझ्या सन्मित्रा, जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कारण नाही. त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते, संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात."

45) "परंतु संपत्तीमान असूनही जो लोभीष्ट आहे, त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच; पण दुःख अनुभवावे लागते. त्याची मात्र कींव केली पाहिजे."

46) "आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले कूळ यांना शोभेल असे आहे. आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवनमार्ग आणि माझे कूळ यांना शोभेल असेच आहे."


🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (उत्तरार्ध)

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म