3. समाधी मार्गाचे शिक्षण

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग तिसरा- नव्या प्रकाशाच्या शोधात
In Search of New Light
*********************
3. समाधी मार्गाचे शिक्षण
Training in Samadhi Marga
*************************

1) आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गांचे परीक्षण करीत असताना ध्यानमार्गाची (समाधी, Concentration of the Mind) माहिती करुन घ्यावी असे त्याला वाटले.

2) ध्यानमार्गाचे तीन पंथ होते.

3) या सर्व प्रकारांत एक गोष्ट समान होती, आणि ती म्हणजे, ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियत्रंण ठेवणे.

4) एका पंथाने अनापानसति नावाची श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरली होती.

5) दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात.
i) श्वास आत घेणे (पूरक)
ii) श्वास रोखून धरणे (कुंभक)
iii) श्वास बाहेर सोडणे (रेचक)

तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता.

6) आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलारकालामाच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले.

7) म्हणून तो आलारकालामाशी याविषयी बोलला आणि "मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय?" असे त्याने त्यांना विचारले.

8) "मोठ्या आनंदाने!" आलारकालामांनी उत्तर दिले.

9) आलारकालामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले. त्याच्या एकूण सात सिद्धी (stages) होत्या.

10) गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करु लागला.

11) त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यानंतर "आणखी शिकण्यासारखे काही आहे काय?" असे गौतमाने आलारकालामांना विचारले.

12) आलारकालामांनी उत्तर दिले, "नाही मित्रा. माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच." नंतर गौतमाने आलारकालामाचा निरोप घेतला.

13) उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलारकालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते, त्याच्यापेक्षा पुढची एक पायरी ध्यानीपुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती.

14) त्याचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक- रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला.

15) थोड्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलारकालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की, "आणखी काही शिकण्याजोगे आहे काय?"

16) आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, "नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा अधिक माझ्याजवळ काही नाही."

17) आलारकालाम आणि उद्दक-रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते कि, मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्गसंपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला.

18) त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला.

19) त्याला असे आढळून आले की, त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कोशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती.

20) ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती.

21) गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानांतून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे जाणवत होते.

22) ती दुःखदायक प्रक्रिया होती. तरी पण त्यात कौशल्यपूर्ण निपुणता प्राप्त करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी-मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते.

*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - नव्या प्रकाशाच्या शोधात
४. वैराग्याची कसोटी
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म