3. 'ब्राह्मणे'
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
The Buddha and His Predecessors
*********************
3. 'ब्राह्मणे'
The Bramhanas
*************************
1) वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ 'ब्राम्हणे' या नावाने ओळखले जातात. दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राम्हणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारखेच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना 'श्रुति' या नावाने संबोधितात.
2) ब्राम्हणी तत्त्वज्ञान चार सिद्धांतांवर आधारलेले आहे.
3) पहिला सिद्धांत असा की, वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक (infallible) आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. (not to be questioned)
4) ब्राम्हण तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की, योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राम्हणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते; म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते.
5) वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राम्हणापाशी होती असे नव्हे; तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती.
6) या आदर्श समाजरचनेला त्यांनी "चातुर्वर्ण्य" असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे. आणि ज्याअर्थी वेद हे स्खलनातीत व वादातीत आहेत; त्याअर्थी समाजरचनेची चातुर्वर्ण्य पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे.
7) ही समाजपद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती.
8 ) पहिला नियम असा की, समाज चार वर्णांत विभागला जावा:
1)ब्राम्हण 2)क्षत्रिय 3)वैश्य आणि 4)शूद्र
9) दुसरा नियम असा की, या वर्णांत सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजे.
10) सर्वांच्या वर ब्राम्हण असले पाहिजे. ब्राम्हणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय; क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य; आणि शुद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत.
11) हक्क आणि अधिकार (rights and privileges) यांच्या बाबतीत या चार वर्णांत समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता.
12) ब्राम्हणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते हक्क आणि अधिकार असत. पण ब्राम्हणाला जे हक्क आणि अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत; पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत. आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच; पण खास हक्क तर मुळीच नव्हते. तीन वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता.
13) चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम हा "व्यवसायाच्या विभागणी संबंधी" होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राम्हणाचा व्यवसाय होता. क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता. व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आला होता. आणि तीन वर्गांची सेवा करणे हा शुद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे.
14 ) चातुर्वर्ण्याचा चौथा नियम "शिक्षणाच्या हक्कासंबंधी" होता. चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क शूद्रांना नाकारण्यात आला. ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील "स्रियांना" देखील तो नाकारण्यात आला.
15) चातुर्वर्ण्याचा पाचवा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते. पहिल्या आश्रमाला "ब्रम्हचर्य" म्हणत. दुसऱ्याचे नाव "गृहस्थाश्रम" असे होते. तिसऱ्याला "वानप्रस्थ" आणि चवथ्या आश्रमाला "संन्यास" अशी नावे होती.
16) पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उदिष्ट् वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करुन देणे व चौथ्या आश्रमाचे उदिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते.
17) या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्रियांना वर्ज्य होता.
18) चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना (divine pattern). तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राम्हणांनी नियमाला आदर्शाचे स्वरुप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. (The Brahmins had idealised the rule and had realised the ideal without leaving any cracks or loopholes. )
19) ब्राम्हणी तत्त्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राम्हणांचे कर्मवादाचे तत्त्वज्ञान हे 'पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो?' या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राम्हणी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की, 'आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे.' दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते.
20) ब्राम्हणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धांचा तीव्र विरोध होता. वेद हे स्खलनातीत (infallible) आहेत व त्यांचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले.
21) त्यांच्या मते निर्दोष, वादातीत व अंतिम असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा.
22) माणसाला सत्य समजले पाहिजे. बुद्धांच्या मते विचारस्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. आणि सत्य शोधून काढण्याचा विचारस्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती.
23) वेद वादातीत व अचूक आहेत असे मानणे (infallibility of the Vedas) याचा अर्थ विचारस्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय.
24) या कारणास्तव ब्राम्हणी तत्त्वज्ञानाचा पहिला सिद्धांत तथागत बुद्धांना दोषी वाटला.
25) ब्राम्हणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये (sacrifices) काही तथ्य जरी असले, तरी खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यांत त्यांनी भेद केला. (true sacrifice and false sacrifice)
26) 'दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे' हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी, एखाद्या पशूचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय.
27) ब्राम्हणी यज्ञ (sacrifices) हे बहुधा ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञांचा 'खोटे यज्ञ' म्हणून बुद्धांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते.
28) यज्ञविरोधी असलेले लोक ब्राम्हणांचा उपहास करुन म्हणत, "पशूचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल."
29) बुद्ध या विचारांशी अंतःकरणपूर्वक सहमत होते.
30) यज्ञाचा सिद्धांत बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता, तितकाच चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता.
31) चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राम्हण धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटत नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या वर्चस्वासाठी तयार केलेली अशी ती समाजरचना होती. तथापि, मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता.
32) ब्राम्हणांची चातुर्वर्ण्य पद्धत ही कधीही न बदलणारी कायमस्वरुपाची अशी समाजरचना होती. एखादा ब्राह्मण झाला की तो कायमचाच ब्राह्मण. एखादा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय. एखादा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य. आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरुन प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गूण कितीही भयंकर असला तरीही त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे; आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते.
33) विषमता प्रत्येक समाजात असते. पण ब्राम्हणी धर्मात अगदी निराळे होते. ब्राम्हणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व (official doctrine) होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगूळ नव्हते. ब्राम्हणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्याचा विरोध होता.
34) ब्राम्हणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही. धार्मिक वटवृक्षाखाली वर्गवार क्रमिक विषमता हे त्याचे सार होते (graded inequality).
35) समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहिले, पण क्रमवार विषमतेनेे समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ते अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धांना वाटते.
36) चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरुन निश्चित केले गेले होते.
37) चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राम्हणी धर्माने ज्या तात्त्विक पायावर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसेल, तरी तो चुकीचा खास होता.
38) त्यांना हे स्पष्ट दिसले की, चातुर्वण्याने सर्वांच्या हितसंबधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही. तर खरोखर मूठभर लोकांच्या हितासाठी, बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणूनबुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले.
39) दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवणूक करण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती.
40) बंडाची प्रवृत्ती (spirit of revolt) पूर्णपणे मारुन टाकण्यासाठीच ब्राम्हणांनी कर्मवाद तयार केला होता; असे बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करुन बदलू शकत नव्हता; कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती.
41) ब्राम्हणी तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करुन टाकली होती त्या 'शूद्र आणि स्त्रिया' या दोन वर्गांना या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते.
42) विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राम्हणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करुन टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राम्हणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करु लागले.
43) शस्त्र धारण करणे हा मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे. परंतु शूद्रांना शस्त्र धारण करणे नाकारण्यात आले होते.
44) ब्राम्हणी धर्माच्या वर्चस्वाखाली 'स्वार्थी ब्राम्हणी व्यवस्था', 'सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय' आणि 'धनवान वैश्य' यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करुन ठेवण्यात आले होते.
45) अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणित समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धांना माहीत होते. ती फक्त संपवून टाकणेच शक्य होते.
46) या कारणांसाठी, 'खऱ्या जीवनमार्गाला विरोधी' असे असल्याने 'ब्राम्हणी तत्त्वज्ञान' बुद्धांनी अमान्य केले.
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
४. उपनिषदे आणि त्यांची शिकवण
*********************
Comments
Post a Comment