4. आत्म्यावरील विश्वास हा खरा धम्म नव्हे

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?
*************************
4. आत्म्यावरील विश्वास हा खरा धम्म नव्हे
Belief in Soul is not Dhamma
************************

1) भगवान बुद्धांनी म्हटले आहे की, आत्म्यावर आधारलेला धर्म हा काल्पनिक धर्म आहे. (based on speculation)

2) कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही.

3) आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे.

4) जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन (mind) आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे.

5) तथागत म्हणाले, "आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे."

6) म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही.

7) असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा, अंधश्रद्धांचा जनक ठरतो.

8). बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्यांनी त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे.

9) आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील ईश्वरावरील विश्वासाइतकाच सर्वसाधारण (common) आहे.

10) आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राम्हणी धर्माचे एक अंग होते.

11) ब्राम्हणी धर्मात जीवाला 'आत्मा' किंवा 'आत्मन्' संबोधितात.

12) ब्राम्हणी धर्मात आत्मा हे त्या तत्त्वविशेषाला नाव देण्यात आले आहे, की जे शरीरापासून वेगळे; परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते.

13) आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तदनुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात.

14) आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो.

15) शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे.

16) "बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय?" नाही; तो विश्वास ठेवीत नसे. आत्म्यासंबंधी त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद (An-atta) असे म्हणतात.

17) अशरीरी आत्मा मानला तर त्याच्यासंबंधाने अनेक प्रश्न उदभवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली.

18) आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी आपल्या नेहमीच्या, फेरतपासणीच्या (cross examination) पद्धतीने दाखविले.

19) जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे त्यांनी विचारले.

20) आनंदाला त्यांनी सांगितले, "आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात, 'माझ्या आत्म्याला आकार आहे, आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे.' दुसरे काही म्हणतात की, 'आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे.' आणखी काही असे म्हणतात की, 'तो निराकार आणि अनंत आहे."

21) "आनंद, आत्म्यासंबंधी नानाप्रकारची मते आहेत."

22) "जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे?" हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता. कोणी म्हणतात 'आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे.' दुसरे कोणी म्हणतात की, 'नाही; माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अननुभवशील आहे.' आणखी दुसरे म्हणतात, 'नाही; माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे.' आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत.

23) यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला.

24) बुद्धांनी असाही प्रश्न विचारला की, "शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय?"

25) त्यांना अगणित उत्तरे अस्पष्ट स्वरूपात मिळाली.

26) "शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय?" यासंबंधी त्यांना आठ भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली.

27) "आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय?" यासंबंधीही त्यांना अगणित कल्पना आढळल्या.

28) तथागतांनी, "शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो?" हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय, यासंबंधी श्रमण ब्राम्हणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की, "तो अतिशय दुःखी असतो." काही म्हणाले, "तो सुखी असतो." इतर काही म्हणाले की, "तो सुखी व दु:खी असतो;" व इतर म्हणाले, "तो सुखी अथवा दुःखीही नसतो."

29) आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील ह्या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुन्दाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते.

30) चुन्दाला तथागत म्हणाले, "हे चुन्द, जे श्रमण, ब्राम्हण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, 'मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय?' आणि ते उत्तर देतात, 'होय. माझेच मत खरे आहे. दुसरी मते मूर्खपणाची आहेत.' मी त्यांचे मत स्वीकारीत नाही. का? कारण, लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानीत नाही. एवढेच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानीत नाही."

31) आता एक महत्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की, "आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांची विचारसरणी काय होती?"

32) ईश्वराचे अस्तित्व नाकारताना भगवान बुद्धांनी जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे, तीच त्यांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे.

33) त्यांनी असा विचार मांडला आहे की, आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही ईश्वराच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे.

34) ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मादिठ्ठीला जितका बाधक आहे, तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे.

35) त्यांनी असे विवेचन केले आहे की, ईश्वरावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो, त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना, अंधश्रद्धेला कारणीभूत होतो. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भंयकर आहे. कारण त्यामुळे पुरोहितवर्ग निर्माण होतो. भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो.

36) ह्या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तिवासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की, त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात, त्यांनी ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे.

37) ही सर्व मते चूक आहेत. कारण त्यांनी महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की, आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. (Anatta, i.e., non-soul)

38) आत्म्याच्याविरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे.

39) आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी आपला 'नामरूप सिद्धांत' मांडला.

40) हा नामरूप सिद्धांत 'विभज्ज-वादाच्याद्वारे' केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानवी व्यक्तीत्वाचा अथवा मानवाच्या अस्तित्वाविषयी घटकांच्या अतिशय सूक्ष्म, काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. (The theory is the result of the application of the Vibhaja test, of sharp, rigorous analysis, of the constituent elements of Sentient being, otherwise called Human Personality.)

41) नाम-रूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे.

42) भगवान बुद्धांच्या मतानुसार 'प्राणी हा काही भौतिक तत्त्वे आणि काही मानसिक तत्त्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे.' या भौतिक आणि मानसिक तत्त्वांना 'स्कंध' म्हणतात. (some physical elements and some mental elements)

43) रूपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या चार तत्त्वांचा परिणाम आहे. हे स्कंधरूप अथवा शरीराचे घटक होत.

44) रूपस्कंधाशिवाय 'नामस्कंध' हीही एक गोष्ट आहे, तेही प्राण्यांच्या रचनेचे घटक आहेत.

45) ह्या नामस्कंधाला विज्ञान- consciousness (चेतना) असे म्हणतात. या नामस्कंधात तीन मानसिक घटकतत्त्वे आहेत. वेदना (सहा इंद्रियांचा त्यांच्या-त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती), संय्या (संज्ञा, perception) आणि संकार (संस्कार, states of mind). विज्ञान (चेतना) या तीन नामस्कंधात समाविष्ट केली जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की, विज्ञान (Consciousness) हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्त्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे.

46) पृथ्वी, जल, तेज आणि वायू या चार तत्त्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते.

47) भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो.

48) हे सिद्धांतविरोधी असे विचारतात की विज्ञान (चित्त) याची उत्पत्ती कशी होते?

49) हे सत्य आहे की, माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची (चित्ताची) उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे चार भौतिक तत्त्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल?

50) तथागत बुद्धांचे उत्तर असे नव्हते की, या चार भौतिक तत्त्वांच्या सद्यःस्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. तथागतांनी असे म्हटले आहे की, जेथे शरीर अथवा रूप-काया आहे तेथे त्याच्यासह नाम-कायाही राहात असते.

51) आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र (Electric Field) असते. तेथे तेथे त्याच्यासह 'आकर्षण क्षेत्र' (Magnetic Field) असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही. परंतु हे नेहमीच विद्युतक्षेत्राबरोबर असते.

52) शरीर आणि विज्ञान (चेतना- Consciousness) यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे, असे का म्हणू नये?

53) आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात 'प्रेरित क्षेत्र' (Induced Field) असे समजले जाते. विज्ञान हेही रूप-कायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये.

54) भगवान बुद्धांची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथेच समाप्त होत नाही. ह्याशिवाय त्यांना आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते.

55) जेव्हा विज्ञानाचा (चित्त अथवा चेतना यांचा) उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान (consciousness) हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे.

56) विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे.

57) विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते 'ज्ञानमूलक' असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल.

58) सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते, तेव्हा त्याला 'भावनामूलक विज्ञान' म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते.

59) विज्ञान (volitional consciousness) आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे.

60) यावरून असे स्प्ष्ट होते की, प्राणी जेवढी क्रिया करतो ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो.

61) ह्या विश्लेषणानंतर तथागत बुद्ध एक प्रश्न करतात की, आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते? आत्म्याची म्हणून जी कार्ये मानली जातात, ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात.

62) ज्याचे काही कारण नाही, असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे.

63) या पद्धतीने तथागत बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे.

64) याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म