4. शोकग्रस्त आनंद

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
4. शोकग्रस्त आनंद
Ananda in Grief
*************************

1. जसजसे वय होत चालले तसतशी बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सहाय्यकाची (personal attendant) जरुरी वाटू लागली.

2. प्रथम त्यांनी *नन्दाची* निवड केली. त्यानंतर त्यांनी *आनन्दाची* निवड केली. *तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली.*

3. आनन्द हा केवळ तथागतांचा सहाय्यक व परिचारक होता असे नाही, तर तो त्यांचा सतत सोबत असणारा व सर्वात प्रिय सहकारी होता.
(Ananda was his constant and dearest companion, not merely an attendant.)

4. जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व दोन शालवृक्षांच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले, तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनन्दाला विश्वासात घ्यावे असे त्यांना वाटले.

5. म्हणून त्यांनी आनन्दाला हाक मारली आणि म्हणाले, "आनन्द! ह्या शालवृक्षांमध्ये कुशीनाराच्या ह्या उपवनात *रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी* तथागतांचे परिनिर्वाण होईल."
("...at the third watch of the night, in the Uppavana of Kushinara. between the twin Sal trees, the utter passing away of the Tathagata will take place.")

6. तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनन्द म्हणाला, "भगवान! आपण *बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी,* जगाच्या अनुकम्पेसाठी तसेच मानवांच्या कल्याणासाठी कल्पान्तापर्यंत राहण्याची कृपा करा."

7. आनन्दाने त्रिवार अशी विनंती केली. "बस्स, बस्स, आनन्द! तथागतांची अधिक विनवणी करू नकोस. अशी विनंती करण्याचा समय निघून गेला."

8. "आनन्द! आता मी वृद्ध झालो आहे. वयस्क झालो आहे. माझा जीवनप्रवास आता संपत आला आहे. माझी आयुर्मर्यादा मी गाठली आहे. *माझी ऐंशी वर्षे आता उलटली.* ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरुन झिजून एखादे दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागतांच्या देहाचीही झाली आहे." हे ऐकल्यावर आनन्द तिथून निघून गेला.

9. स्थविर आनन्द दिसला नाही तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले, "आनंद कुठे आहे?" "स्थविर आनन्द निघून गेले आणि ते अश्रू ढाळत आहेत." भिक्खू म्हणाले.

10. तथागतांनी एका भिक्खूला बोलावले व ते म्हणाले, "जा आणि आनन्दाला सांग की, तुला तथागत बोलावत आहेत."

11. "जशी आपली आज्ञा." भिक्खू बोलला.

12. आनन्द आला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला.

13. "आनन्द! आता रडू नकोस! मी तुला मागेच सांगितले नाही का, की *आपल्या आवडत्या व जवळच्या वस्तूंपासून अलग व्हावे लागणे, त्यांचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागणे* हे स्वाभाविकच आहे."

14) "आनन्द! तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालीन माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस."

15) "आनंद! तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तूसुद्धा विषयासक्ती, अहंकार, मोह व अज्ञान ह्यासारख्या दुःखद गोष्टींपासून मुक्त होशील."
"You have done well, Ananda! Be earnest in effort, and you too shall be free from the great evils--from sensuality, from individuality, from delusion, and from ignorance."

16) नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले, "आनंद बुद्धिमान, ज्ञानी (wise) आहे. भिक्खूहो, आनंद बुद्धिमान आहे."

17) "तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो. भिक्खू, भिक्खूणींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो. उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्यांची वेळ कोणती, हे ही त्याला ठाऊक आहे."

18) "भिक्खूहो! हे आनंदाचे चार विशेष आहेत."

19) "आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहून त्यांना आनंद होतो."

20) ह्यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, "तथागतांनी या उजाड नगरीत, या जंगलामध्ये देहत्याग करु नये. चम्पा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसाम्बी, वाराणशीसारखी मोठी नगरे आहेत. ह्यापैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे."

21) "आनंद! असे बोलू नकोस. असे बोलू नकोस, आनंद! ही कुशिनारादेखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी आहे."

22) नंतर तथागतांनी आनंदावर दोन कामे सोपवली.

23) त्यांनी आनंदाला सांगितले की, चुन्दाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही ह्याची खबरदारी घे. त्यामुळे चुन्द संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितले की, ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा.

24) आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली. ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की, तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल.

25) तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील की, "आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला समजले नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही."

26) त्यानंतर स्थविर अनुरुद्ध व स्थविर आनंद ह्या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली.

27) आणि त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहारात तथागत बुद्धांनी अखेरचा श्वास घेतला.
(And in the third part of the night, as previously announced, the Blessed One breathed his last.)

28) जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले, तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरुन रुदन करु लागले, काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, "तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले, ह्या सुखी माणसांने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला."

29) वैशाखी पोर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरात तथागत बुद्धांचे परिनिर्वाण झाले. ते वर्ष होते इ.स. पूर्व 483.
(It was at midnight on Vaishakha Paurnima that the Blessed Lord breathed his last. The year of his death was 483 B.C.)

30) पाली भाषेतल्या ग्रंथांत म्हटले आहे:
*दिवा तपति आदिच्चो*
*रत्तिं आभाति चन्दिमा*
*सन्नद्धो खत्तियो तपति*
*झायी तपति ब्राम्हणो*
*अथ सब्बं अहोरतिं*
*बुद्धो तपति तेजसा*

31) "सूर्य केवळ दिवसाच प्रकाश देतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपल्या शस्त्रांना धारण केल्यामुळे क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राम्हण तेजस्वी दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवस रात्र प्रकाशित राहतो."

32) *"निःसंदेह तो जगाचा प्रकाश होता."*
*("He was beyond question the light of the world.")*

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म