4. असहिष्णूंच्या बाबतीत त्यांची उदारता

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग दुसरा - तथागतांची मानवता
Part II- His Humanity
*************************
4. असहिष्णूंच्या बाबतीत त्यांची उदारता
His Tolerance of the Intolerant
*************************

1) एकदा भगवान बुद्ध आलवक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते. तेव्हा आलवक तथागतांकड़े आला व म्हणाला, "श्रमण, चालता हो"

2) "मित्रा, ठीक आहे." असे म्हणून तथागत निघून गेले.

3) तेव्हा यक्ष बोलला, "श्रमण, आत ये."

4) तथागत आत आले व म्हणाले, "मित्रा, ठीक आहे."

5) पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, "श्रमण, चालता हो."

6) "मित्रा, ठीक आहे," असे म्हणून तथागत बाहेर गेले.

7) पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, "श्रमण, आत ये."

8). तथागत आत येता येता म्हणाले, "मित्रा, ठीक आहे."

9) पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, "श्रमण, चालता हो."

10) तथागत जाता जाता म्हणाले, "मित्रा, ठीक आहे."

11) "श्रमण, आत ये." पुन्हा यक्ष म्हणाला.

12) तथागत आत येता येता म्हणाले, "मित्रा, ठीक आहे."

13) पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, "श्रमण, चालता हो."

14) त्यावर तथागत म्हणाले, "मित्रा, मी मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर."

15) यक्ष रागावून म्हणाला, "श्रमण, मी एक प्रश्न विचारतो. तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकीन किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईन."

16) "मित्रा, ह्या जगात मला वेडा करु शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीपलीकडे फेकू शकेल असा कुणी असेलसा दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार."

17) तेव्हा आलवक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले:

18) "ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे?"

19) तथागतांनी उत्तर दिले, *"श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धम्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे."*

20) आलवकाने मग विचारले, "मानवाला पूर (पुनर्जन्म) कसा ओलांडता येतो? मानव (भव) सागर कसा ओलांडतो? मानव दुःख कसे जिंकू शकतो?"

21) तथागतांनी उत्तर दिले, "मानव श्रद्धेच्याद्वारे पूर पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो."

22) आलवक यक्षाने विचारले, "मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते? मानवाला धन कसे प्राप्त होते? मानवाला किर्ती कशी लाभते? मानवाला मित्रप्राप्ती कशी होते? इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही?"

23) तथागतांनी उत्तर दिले, "निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अर्हत तसेच धम्म ह्यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते"

24) "जो उचित तेच करतो, जो दृढ़निश्चयी असतो, तो जागृत असतो. त्यालाच धन प्राप्त होते. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात."

25) "ज्या श्रद्धावान उपासकात सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते त्याला मृत्यूनंतर (मृत्यूच्या वेळी) पश्चाताप होत नाही."

26) "इकडे ये, दुसरे श्रमण व ब्राह्मण इथे आहेत. त्यांनाही विचार की सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता ह्यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय?"

27) आलवक यक्ष म्हणाला, "आता दुसऱ्या श्रमण ब्राम्हणांना कशाला विचारायला हवे? आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली."

28) "खरोखरच माझ्या भल्यासाठीच म्हणून तथागत आलवीला आले. आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते."

29) "आजपासून तथागत व त्यांच्या धम्माला वंदन करत करत एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईन."


Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म