4. बिंबिसार राजाची धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
*************************
4. बिंबिसार राजाची धम्मदीक्षा
Conversion of Bimbisara
*************************
1) 'राजगृह' ही मगधराजा- सेनिय बिंबिसाराची राजधानी होती.
2) एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षान्तर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला.
3) अशा प्रकारे बिंबिसार राजाला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले.
4) राजा बिंबिसाराने मनात विचार केला, "अत्यंत कर्मठ आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षान्तर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित तो अर्हत आणि सम्यक् सम्बुद्धच असला पाहिजे. तो विद्धान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष, देव आणि मानवांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे."
5) "ज्याचा आदि, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर व अचूक आहेत, असाच धम्म तो शिकवीत असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय."
6) म्हणून बिंबिसार राजा मगधातील द्वादश दशसहस्त्र (twelve myriads) ब्राम्हण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. बुद्धांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते बारा दशसहस्र ब्राम्हण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतास कुशलक्षेम विचारून त्याच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले. काही जण काही एक न बोलता जवळ बसले.
7) मगधातील त्या बारा दशसहस्त्र ब्राम्हणांनी आणि गृहस्थांनी बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरूवेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, "हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उरुवेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे?"
8) त्या सर्वांच्या मनात उद्भभवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, "हे उरुवेलवासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्नी-पूजा सोडून दिलीस? अग्नीहोत्राचा त्याग केलास, हे कसे काय घडले?"
9) काश्यपाने उत्तर दिले, "रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनापूर्ती, या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या गोष्टी अशुद्ध आहेत, हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यांत गोडी वाटली नाही."
10) "पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा."
11) नंतर उरुवेला काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. तथागतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने प्रणाम केला आणि तथागतांना तो म्हणाला, "तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे." तेव्हा मगधातील त्या ब्राम्हणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेला काश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे.
12) नंतर त्या बारा दशसहस्त्र ब्राम्हणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राम्हण व गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. एक हजार लोकांनी आपण बुद्धांचे उपासक झाल्याची घोषणा केली.
13) ते दृश्य पाहून, धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर, आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज सेनिय बिंबिसार तथागतांना म्हणाला, "तथागत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत."
14) "भगवन्, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, 'माझा राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल!' भगवन्, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर, 'एखादा अर्हत, सम्यक्-संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल!' ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवन्, ती आता पूर्ण झाली आहे. आणि 'त्या तथागतांची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल!' ही माझी तिसरी इच्छा होती. आणि हे भगवन्, ती आता पूर्ण झाली आहे. आणि 'त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा' अशी माझी चवथी इच्छा होती. हे भगवन्, तीही आता पुरी झाली आहे. आणि 'त्या भगवंताचा धम्म मला कळावा' अशी माझी पाचवी इच्छा होती. हे भगवन्, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवन्, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा होत्या."
15) "आश्चर्य, हे भगवन् आश्चर्य! जे विस्कळित झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे तथागतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य! भगवन्! भगवान बुद्धांना, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा."
Comments
Post a Comment