4. धम्मदीक्षेची जोखीम

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
Conversion of the Fallen and the Criminals
*************************
4. धम्मदीक्षेची जोखीम
The Risk of Conversion
*************************

1) पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत.

2) (भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्या वेळी ते पुढीलप्रमाणे उपदेश करतात.)

3) "जो दयाळू आहे, तो प्राण्याची हत्या करीत नाही (किंवा प्राण्याची हत्या न करणे हा माणुसकीचा धर्म होय); तो (स्वतःच्या?) जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो."

4) "हे तत्त्व अमर आहे; या तत्त्वाचे पालन करणाऱ्यांवर कधीही संकट कोसळणार नाही."

5) "विनयशीलता, ऐहिक गोष्टींविषयीची उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणाला क्रोध येईल असे न करणे- हे ब्रम्हलोकाचे लक्षण आहे."

6) "दुर्बलाविषयी कणव, बुद्धांच्या शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन, किती आवश्यकता (गरज) आहे याची जाणीव, आवश्यक ते मिळाल्यावर थांबणे--- जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे." हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले. आणि पुरुष परत आल्यानंतर तथागतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरुन धरले आणि हे मैत्रीचे सुक्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले.

7) आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले.

8). "जो प्राणिमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो."

9) *"त्यांचे शरीर/आरोग्य नेहमी स्वस्थ (सुखी) असते; त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो, त्या वेळीही त्याला एकाग्रता लाभते."*

10) *"त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत. देव त्याचे रक्षण करतात व माणसे त्याच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही. आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो; अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही."*

11) *"तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो. हेच ते अकरा लाभ होत."*

12) हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या सर्व स्त्रिया आणि पुरुषांना त्यांच्या शिष्यवर्गात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली.


*************************
दुसरा खंड समाप्त
*************************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म