4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
VI (सहा)- बुद्धांची सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने
SECTION SIX-- SERMONS ON SOCIO-POLITICAL QUESTIONS
*************************
4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे
War is Wrong
*************************
1) एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदल, पायदळ गोळा करुन पसेनदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली .पसेनदीनेही स्वारीचा वृत्तात ऐकून घोडदळ, पायदळाचे सैन्य जमवले आणि तो अजातशत्रुला तोंड द्यावयास निघाला.
2) त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रुने राजा पसेनदीचा पराभव केला. आणि पसेनदीने शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे सैन्य माघारी घेतले.
3) श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करुन परत आले. आणि त्यांनी तथागतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसेनदीची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले.
4) तथागत म्हणाले, "मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील सर्व दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेनदी हा चांगुलपणाचा मित्र आहे. सध्यातरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणुन दुःखात रात्र काढावी लागणार आहे."
5) "विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला (जो पराभूत झाला त्याला) दुःखात काळ काढावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो. कारण अशा माणसांच्या गावी जय आणि पराजय यांची वार्ताच नसते."
6) पुन्हा असे घडले की, त्या दोन राजांचे पुन्हा एकदा युद्ध जुंपले. परंतु त्या युद्धात कोसलराजा पसेनदी याने अजातशत्रुचा पराभव करुन त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेनदीने स्वतःशी विचार केला की, "मी यांच्या वाटेला गेलो नसतानाही हा राजा माझ्या पुतन्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्यांचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर?" आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले.
7) श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करुन परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता तथागतांच्या कानी घातली. त्यावर तथागत म्हणाले, "माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो. परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात, तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत इतरांना लुटण्याची ईर्षा धरतो."
8). "जोपर्यंत पापाची फळे पक्व झाली नाही तोपर्यंत मुर्खाला सदैव वाटते, 'मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार.' परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागते."
9) "हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणी तरी भेटतोच. जेत्याला जिंकणारा कोणी तरी भेटतोच. निंदकाला निंदक सापडतो."
10) "अशा रीतीने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावर ही कर्मविपाकामुळे आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते."
Comments
Post a Comment