5. तथागत बुद्ध आणि सारिपुत्त यांची अंतिम भेट

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग पहिला- निकटवर्तीयांच्या भेटी
Part I- The Meeting of those Near and Dear
*************************
5. तथागत बुद्ध आणि सारिपुत्त यांची अंतिम भेट
The Last Meeting between the Buddha and Sariputta
*************************

1) तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते.

2) पाचशे भिक्खूंसह सारीपुत्त तेथे आला.

3) त्यांना अभिवादन करुन सारीपुत्त म्हणाला की, पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. तथागत बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय?

3) तथागत बुद्धांनी सारीपुत्ताला विचारले की, परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय?

4) सारिपुत्ताने त्यांना सांगितले, "मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तेथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे."

6) तथागत बुद्ध म्हणाले, "प्रिय सारीपुत्त, तुला बरे वाटेल ते कर."

7) तथागत बुद्धांच्या चरणी डोके ठेवून सारीपुत्त म्हणाला, "आपल्या चरणवंदनाचा सन्मान प्राप्त व्हावा या एकमेव आशेसाठी एक सहस्त्र कल्पापर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफळ झाली आहे. आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही."

8). "पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही; त्याअर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधांबद्दल तथागतांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे."

9) "सारीपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही." तथागत बुद्ध म्हणाले.

10) जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ तथागत बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले.

11) तेव्हा सारिपुत्त तथागतांना म्हणाला, "जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही."

12) आपले दोन हात जोडून तथागतांकडे पाठ न करता सारीपुत्त तिथून निघून गेला.

13) त्यावर उपस्थित भिक्खूसंघास तथागत बुद्ध म्हणाले, "आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा." भिक्खूवर्ग प्रथमच तथागतांना सोडून सारिपुत्ताच्या मागे गेला.

14) आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला.

15) सारिपुत्ताचे देहसंस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी तथागत बुद्धांपाशी नेल्या गेल्या.

16) सारिपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यानंतर तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले, *"तो सर्वोच्च विद्धान होता. त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो त्याच्या अस्थीकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृथ्वीसमान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करु दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकारवशतेवर त्याने विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती."*

17) त्याच सुमारास महामोग्गलायन राजगृहासमीप एका एकांतविहारात राहात होता. तथागत बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली.

18) महामोग्गलायनाच्या दुःखद मृत्यूचे वृत्त तथागतांना सांगितले गेले. *सारिपुत्त आणि महामोग्गलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म-सेनापती असे म्हटले जात असे.* आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी तथागत या दोघांवर अवलंबून होते.

19) आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने तथागत बुद्ध खूप व्यथित झाले होते.

20) आता श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही. म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरविले.
 

**************************
खंड सातवा; भाग पहिला समाप्त
**************************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म