5. विशाखेची दानशूरता

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग पहिला- बुद्ध आणि त्यांचे समर्थक
Part I- His Benefactors
*************************
5. विशाखेची दानशूरता
Munificence of Vishakha
*************************

1) विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरीच मुले आणि नातवंडे होती.

2) जेव्हा तथागत श्रावस्तीत राहात होते, तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली होती. आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले.

3) त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चीवरे काढून ठेवली. आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला.

4) दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, "तथागत, मला आपणाकडून आठ वर हवे आहेत."

5) तथागत म्हणाले, "विशाखा, वर कोणते ते सांग. ते समजल्याविना तथागत वर देऊ शकत नाही."

6) विशाखा बोलली, "मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी आहेत."

7) तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा बोलली, "तथागत, आयुष्यभर वर्षाकालात भिक्खूसंघाला चीवरे द्यावीत अशी माझी इच्छा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रुषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खूसंघाला खीर तसेच भिक्खूणी स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे."

8). तथागत म्हणाले, "पण विशाखा, तथागताकडून हे आठ वर मागण्यात तुझा हेतू काय आहे?

9) आणि विशाखा बोलली, "तथागत, मी सेविकेली आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खूसंघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली पण ती विहारात पोहचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपआपली वस्त्रे उतरुन ठेवली असल्याचे तिच्या दृष्टीस पडले. तिला असे वाटले की ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत. म्हणून ती परतली. तिची समजून घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले."

10) "तथागत, नग्नता अपवित्र आणि किळसवाणी असते. ह्यामुळेच संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली."

11) "माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगावयाचे म्हणजे दुरुन येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहित नसल्यामुळे भिक्षा मिळवताना वाटेत थकून जातात. तथागत, ह्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी आशी माझी इच्छा आहे."

12) "तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू मिळवता मिळवता मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशीरा पोहोचेल. साहजिकच मार्ग कापता कापता तो थकून जाईल."

13) "चौथा म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंत ही होईल."

14) "पाचवे म्हणजे रुग्णांची शुश्रुषा करणाऱ्या भिक्खूंना बाहेर जावून भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही."

15) "सहावे म्हणजे, "रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल."

16) "सातवे म्हणजे, तथागत, आपण खीरीची प्रशंसा केली आहे की, तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते. भूक-तहान शमते. निरोगी माणसास ती पौष्टीक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते. म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी इच्छा आहे."

17) "शेवटचे म्हणजे, तथागत, अचिरावती नदीत भिक्खूणी गणिकांसमवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्या वेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा? वृद्धापकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. तथागत, नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट ठरते."

18) "माझ्या वर मागण्याचे हे प्रयोजन आहे."

19) तथागत म्हणाले, "पण विशाखा, तथागतांकडून हे आठ वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे?"

20) विशाखा म्हणाली, "वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीत येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील, "अमुक अमुक भिक्खू निधन पावला आता त्याला काय गती मिळेल? त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की, त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला अर्हतत्व प्राप्त झाले आहे."

21) "आणि मग मी तिकडे जाऊन त्यांना विचारीन की, प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पुर्वी होता काय? आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की, नक्की वर्षावासासाठी त्याला चीवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल."

22) "आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तुप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या ह्रदयात शांती निर्माण होईल. एका प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्त संबोधीचा उपयोग (exercise of the seven kinds of wisdom) केल्यासारखे होईल. तथागत हे आठ वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता."

23) त्यावर तथागत म्हणाले, "विशाखा, फार बरे. हे लाभ ध्यानात घेऊन तू हे आठ वर मागितले. जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे रागलोभादि मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे मनोविकार गुणविकासास कुंठीत करुन टाकतात."

24) त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखाचे आभार मानले, "शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने निःस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य, दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठीत असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल."

25) विशाखाने पुर्वाराम विहार संघास दान दिले आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला. 



भाग पहिला समाप्त

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म