5. अनाथपिंडकाची धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
*************************
5. अनाथपिंडकाची धम्मदीक्षा
Conversion of Anathapindika
*************************
1) सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित् (Pasenjit) याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे.
2) भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता.
3) तो आला त्या वेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले, की येथे एखादा लग्नसंमारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले.
4) वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांस भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला.
5) आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या ह्रदयातील शुद्ध भाव ओळखून दिलासादायक शब्दांनी आपुलकीने त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली.
6) तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, "आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर, वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता, तर सर्व प्राणिमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्यापुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू (selfexistent one) असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो, हे तुमच्या लक्षात येईल."
7) "आणखी असे म्हटले जाते की, ब्रम्ह (the Absolute) हे जगत्कारण असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रम्ह हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही."
8 ) "आणखी असे म्हटले जाते की, आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे?"
9) "दुसरे असे की, निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काहीएक नाही, आणि कार्यकारणभावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन?"
10) "म्हणून आमचे म्हणणे असे की, अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रम्ह, आत्मा आणि कारणरहित असे दैव यांपैकी कोणीही निर्माता नाही; तर आपल्याच कृत्याचे बरेवाईट परिणाम होत असतात."
11) "सर्व विश्व 'प्रतीत्य-समुत्त्पाद' म्हणजे कार्यकारणभावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे (Law of Causation). आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असते."
12) "म्हणून आपण ईश्वरपूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडांचा त्याग करुया. ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टींविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करुन घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करुया आणि कुशल कर्म करुया, म्हणजे त्यांचे फळही चांगले मिळेल."
( let us practise good so that good may result from our actions.)
13) अनाथपिंडक म्हणाला, "बुद्धांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी बुद्धांनी मला उपदेश करावा."
14) "माझ्या आयुष्यांत मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे. तरीही माझ्या कामांत मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर-चाकर आहेत. आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे."
15) "आपले शिष्य परिव्रज्येच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, 'तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे सबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे'."
16) "जे न्याय्य असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की, माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापारउदीम यांचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय?"
17) आणि तथागत म्हणाले, "उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आंनद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु, जो संपत्तीला चिकटून राहात नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल."
18) "माझे तुम्हांला असे सांगणे आहे की, तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या कामात, व्यवसायात लक्ष द्या (diligence to thy enterprises). जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत; तर त्यांची आसक्ती व अभिलाषा त्यांना गुलाम करते."
19) "केवळ निष्क्रिय जिणे जगण्यासाठी जो भिक्खू संसारत्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय; निष्क्रियतेचा व निरुत्साहीपणाचा तिरस्कारच केला पाहिजे."
20) "माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसारत्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसारत्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही.
माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे, असे तथागतांचा धम्म सांगतो."
21) "आणि लोक काहीही करोत; कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत, किंवा संसारत्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवोत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणा-या परंतु पाण्याचा स्पर्श न होणा-या कमळाप्रमाणे ते असतील; जीवनसंघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करत नसतील, आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर सत्यमार्गाचे जीवन जगत असतील, तर आंनद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील."
22) अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले.
23) याप्रमाणे ख-या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने तथागत बुद्धांच्या चरणाशी मस्तक नमविले, आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली.
Comments
Post a Comment