6. केवळ नीती पुरेशी नाही. ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग पहिला- बुद्धांचे त्यांच्या धम्मात स्थान
Part I- His Place in His Dhamma
*************************
6. केवळ नीती पुरेशी नाही. ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे
Mere Morality is not Enough. It must be Sacred and Universal
*************************

1) वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती का पवित्र ठरते?

2) प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात.

3) जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही. किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निषिद्ध समजले जाते.

4) याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्याविरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही.

5) जे पवित्र ते मंगल होय. (Sacred is something holy). त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते.

6) एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की, नीतीला पावित्र्य का दिले गेले?

7) नीतीला पावित्र्य देण्यात तीन घटक कारणीभूत झाले असावेत.

8). पहिला घटक म्हणजे, श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची (protecting the best) सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता.

9) ह्या प्रश्नांची पार्श्वभुमी "जीवनकलह" आणि "जीवनसंघर्षात" (struggle of existence) योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत (survival of the fittest), या सिद्धान्तात आहे.

10) ह्या प्रश्नाचा विकासवादाशी (evolution) संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे की, मानवसमाजाचा विकास जीवनसंघर्षामुळे घडला; कारण प्रारंभिक युगात अन्नसामुग्री अति मर्यादित होती.

11) हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दांत आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात.

12) या भयानक रक्तरंजित संघर्षात जे योग्यतम (fittest) असतात, तेच टिकाव धरू शकतात.

13) ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली.

14) प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणी तरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की, 'जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय? (is the fittest(strongest) the best?) की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय?'

15) तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते.

16) नंतर असा प्रश्न उद्भवतो की, कमजोर (दुर्बल) माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता?

17) जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तीमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे.

18) याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे.

19) प्रारंभी हे निर्बंध योग्यतम (सर्वांत अधिक शक्तिमान) माणसांना लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. (It was imposed originally on the fittest, i.e. strongest.)

20) यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरुपाचे आहेत.

21) पहिला प्रश्न असा निर्माण होतो की, सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक (समाजहित विरोधी) तर होत नाही ना?

22) *चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. व्यापा-यांतही आपापसांत नीती असते. एकाच जातीच्या माणसांत आपापसांत नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसांत नीती असते.*

23) परंतु या नीतीचे स्वरूप, 'वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता' निर्माण करणारे असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित, म्हणजेच समाजहित-विरोधक असते (anti-social).

24) या प्रकारच्या नीतीतील 'वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता' हे तिचे समाजविरोधक रूप अगदी उघडे करतात.

25) जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो, तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते.

26) अशा प्रकारे होणा-या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात.

27) जर समाज असा असामाजिक (anti-social) समुहांचा बनला तर तो समाज असंघटित व विखुरलेला राहील.

28) असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की, तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो.

29) आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनांचे मानदंड नसल्यास सर्व समाज हा मिळतेजुळते घेणारा असा एकजिनसी राहात नाही.

30) असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजांत व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती (consistency) राखणे अशक्य होते.

31) न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाट हक्क सांगणा-या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो, त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो.

32) अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणा-या अशा सर्वसामान्य नीती-नियमांची आवश्यकता असते.

33) *तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे, आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी.*

34) जीवनसंर्घषात (struggle for existence) किंवा समूहशासनात (under group rule) व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते.

35) ज्या समाजात *समान/सामायिक ध्येये आणि समान आदर्श* यांना सार्वत्रिक मान्यता असते, त्या समाजात व्यक्तीला मानसिक सुसंगती साधता येते. ती सुसंगती जो समाज समुहांत विभागलेला असतो, त्यात साधता येत नाही. समुहाप्रमाणे आदर्श आणि ध्येये भिन्न असली की, समाजातील व्यक्तींचे विचार बहकतात आणि समाज-व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही; ती विकृत (distorted) होते.

36) दुसरे असे की, समूह व्यवस्थेमुळे (group set-up) पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही.

37) समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात. मालक ते मालकच राहतात, कामगार ते कामगारच राहतात. अधिकारसंपन्न (privileged) ते अधिकारसंपन्नच राहतात आणि गुलाम/ वेठबिगार ते गुलामच राहतात.

38) याचा अर्थ असा की, अशा अवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांना होतो. सर्वांना होत नाही. थोड्या लोकांना समतेचा लाभ होतो. बहुसंख्यांकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते.

39) यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता (fraternity) ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे.

40) बंधुता (fraternity) म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवामानवातील भ्रातृभाव, जे नीतीचेच दुसरे नाव आहे.

41) म्हणूनच बुद्धांनी शिकविले, "धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे."
(Dhamma is sacred so is morality.)

*************************
चवथा खंड, भाग पहिला समाप्त
*************************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म