6. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग)

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
The Conversion of Parivrajakas
*************************
6. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग) 
The Buddha's First Sermon (concluded)
*************************

1) बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यावर परिव्राजकांना विचारले,

2) "व्यक्तीगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय?" त्यांनी उत्तर दिले, "आपण म्हणता ते खरोखर आहे."

3) नंतर तथागत बुद्धांनी विचारले, "लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चोरी, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तीगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तीगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसामध्ये जर व्यक्तीगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, "आपण म्हणता तसेच आहे."

4) "आणखी असे की, दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काहीच का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय?" आणि परिव्राजक उत्तरले, "बरोबर आहे."

5) "जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा- सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मान्त, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा; थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय?" त्यावर ते म्हणाले, "होय."

6) "शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करुन बुद्धांनी विचारले, "गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निःस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची (Nekkhamma) आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय?"

7) "माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय?" आणि ते म्हणाले, "होय."

8) "याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निःपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज दुसऱ्या कशाने मिळू शकेल?"

9) ते सर्व म्हणाले, "होय."

10) "परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुद्धीची- जोड दिली पाहिजे." (intelligence)

11) तथागतांनी विचारले, "प्रज्ञा आवश्यक नाही काय?" परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी तथागत पुढे म्हणाले, "दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी वाईट मार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसांच्या अंगचे गुण होत." परिव्राजक म्हणाले, "होय, ते बरोबर आहे."

12) "परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय?" तथागतांनी विचारले.
"मी म्हणतो, नाही. हे पुरेसे नाही," तथागत परिव्राजकांस पुढे म्हणाले. "हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण लहान मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करु शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही, त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही; त्या अर्थी आईचे दुध पिण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही."

13) "प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी (understanding and intelligence) हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे."

14) "प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे. परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे; परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे. प्रज्ञा पारमिता हे शहाणपणाचेच (wisdom) दुसरे नाव आहे."

15) माझे म्हणणे असे आहे की, अकुशल कर्म (wrong conduct) कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म (right conduct) कोणते आणि अकुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो कि प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे."

16) नंतर परिव्राजकांना पुढीलप्रमाणे इशारा देऊन (admoniton) बुद्धांनी आपले प्रवचन संपविले:

17) "माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे; कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधतो. मी असे सांगतो की, माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टीकोन चुकीचा ठरेल."

18) "माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही. परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरु नका."

19) "माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे." (hope and purpose)

20) "माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय."

21) "या धम्मात आशा आहे. कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो."

22) "तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही?" आणि परिव्राजक म्हणाले, "होय, आम्हाला मान्य आहे."

*************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म