6. प्रसेनजित राजाची धम्मदीक्षा

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
*************************
6. प्रसेनजित राजाची धम्मदीक्षा
Conversion of King Pasenjit
*************************

1) भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला,

2) "माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे. कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील?"

3) "ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र व्यक्तीमत्त्वाचे दर्शन झाले आहे त्याअर्थी आपल्या शिकवणीचे, उपदेशाच्या अमृतजलाचे प्राशन मला करु द्या."

4) "ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरुपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभते."

5) सुखोपभोगाची अभिलाषा व हाव ह्यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून तथागत म्हणाले,

6) "हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो; मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल?"

7) "आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे, समजून घ्यावे व नीट तपासून ते आत्मसात करावे."

8) "आपली बरी-वाईट कृत्ये नेहमी सावलीप्रमाणे आपला पाठपुरावा करतात."

9) "सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय ह्रदयाची!" (That which is most needed is a loving heart!)

10) "आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करु नका; त्यांचा नाश करु नका; आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने, सरळमार्गाने जा, दुस-यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना."

11) "राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका, किंवा तोंडपूजा करणाऱ्यांंनी गोड शब्दांत केलेली स्तुती ऐकू नका."

12) "तपश्चर्येने स्वतःला क्लेश करुन घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्व ओळखा."

13) "दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत. आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल."

14) "मग अन्याय करण्यात काय फायदा आहे?"

15) "सर्व शहाणे लोक शारीरीक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात."

16) "झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य, जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानीच समजला पाहिजे."

17) "ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा (true wisdom) प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हेच एक जीवनाचे ध्येय असले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.

18) "सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे; कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे."

19) "हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही. प्रत्येक मानव-प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते, आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात."

20) "कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा (wisdom) ही नौका आहे, आणि सखोल विचार, चिंतन (reflection) हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा संदेश देतो की, तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा."

21) "आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत."

22) "आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहू या. कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते."

23) "प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधिप्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सूज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील."

24) "सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार/चिंतन करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या."

25) "मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल."

26) भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली, आणि त्यांचा उपासक (lay disciple) होण्याचे त्यांना वचन दिले.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म