6. मंत्र्याचे प्रत्युत्तर

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
*************************
6. मंत्र्याचे प्रत्युत्तर
The Minister's reply
*************************

1) भगवान बुद्धांच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरिच्छ, तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले.

2) "आपला हा निश्चय अति उत्तम आहे, तो अयोग्य नसला तरी या वेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशाप्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही."

3) "आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्मदृष्टीने मीमांसा करण्याइतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात."

4) "दुसरे असे की, काहीजण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात; म्हणून ज्याअर्थी ह्या प्रश्नाबाबत संदेह आहे त्याअर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय."

5) "जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ; पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनासायास मुक्ती मिळाली आहे."

6) "काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात. परंतु ते मुक्तीची शक्यता मानीत नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतःच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात."

7) "काही लोक म्हणतात की, सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत् आणि असत् अशा स्वाभाविक गुणधर्मांतून उत्पन्न होतात: आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले त्याअर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत."

8) "ज्याअर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्याअर्थी वृध्दापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय?"

9) "पाण्यामुळे अग्नि विझतो आणि अग्नि पाण्याची वाफही करतो; ही निरनिराळी तत्त्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात."

10). "गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्या सहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते, असे प्राज्ञ सांगतात."

11) "काट्यांचा अणकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावतःच उत्पन्न होते; त्यांत इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही; मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल?"

12) "इतर काहीजण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो; तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतीमान करतो तोच त्या गतीला संपवू शकतो."

13) "काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्मा आहे; परंतु ते असे म्हणतात की, जन्मास येणे हे विनासायास होते, पण मोक्ष प्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते."

14) "मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो. तसेच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडतो. मनुष्य ह्या तीन ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणांतून मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते."

15) "अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते; अन्यथा ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्याच्या पदरी पडतात."

16) "म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल."

17) अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळीदेखील काही जण अरण्यातून घरी परतले होते." अंबरीश, दृमकेश, इत्यादींची उदाहरणे त्याने या बाबतीत दिली.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म