7. रक्षेसाठी संघर्ष

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
7. रक्षेसाठी संघर्ष
Quarrel Over Ashes
*************************

1) तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशिनारांच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व त्यांच्या सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्याचा त्यांच्या भोवती कोट केला. कोणी त्या सर्व अस्थी किंवा थोडाही अंश चोरु नये म्हणून तिथे पहारा बसवला.

2) सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा-अस्थींना मानसन्मान व आदरांजली अर्पण केली.

3) मगध देशाचा राजा अजातशत्रू ह्याच्या कानी आले की तथागतांचे कुशिनारा येथे परिनिर्वाण झाले.

4) त्याने मल्लांकडे दूत पाठविला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली.

5) त्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियांकडून, कपिलवस्तूच्या शाक्यांकडून, अट्ठकप्प्यांच्या वल्लियाकडून, रामगामाच्या कोलीयांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले.

6) अस्थीचा हिस्सा मागणाऱ्यांत वेठदीपाचा एक ब्राह्मणही होता.

7) एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशिनाराचे मल्ल म्हणाले, "तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांच्या अवशेषांचा अंशही आम्ही कोणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे."

8). परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राम्हण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, "माझे दोन शब्द ऐका."

9) द्रोण म्हणाला, "ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवरांच्या अस्थीच्या हिस्स्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय."

10) "आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थीचे सारखे आठ हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की, जेणेकरुन त्या त्या सर्व ठिकाणी त्यांची पुजा जनतेला करता येईल."

11) कुशिनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, "हे ब्राम्हणा, तूच ह्या अवशेषांचे सारखे आठ हिस्से करुन सुयोग्य वाटणी कर."

12) "ठीक आहे." द्रोणाने संमती व्यक्त केली.

13) नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे आठ हिस्से केले.

14) हिस्से करुन झाल्यावर द्रोण म्हणाला, "मला हे रक्षापात्र द्याल तर मीही त्यावर एक स्तूप बांधून काढीन."

15) सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शवली.

16) अशा रीतीने तथागतांच्या अस्थी-रक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांततेने आणि सलोख्याने मिटला.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म