7. भगवान बुद्धांचा मनोनिग्रह
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home
*************************
7. भगवान बुद्धांचा मनोनिग्रह
The Buddha's Determination
*************************
1) राजाचा जणू काय डोळाच असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले,-- त्यांचे उत्तर सुसंबद्ध होते, मुद्देसूद व क्रमवार होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते.
2). "एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही; तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन."
3) "अज्ञात व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करु शकत नाही. कोणता सूज्ञ मनुष्य दुस-याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या इतर आंधळ्यांप्रमाणे आहे."
4) "पंरतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटाविषयी संदेह असेल, तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात."
5) "परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा (trustworthiness means absence of faults). जो सर्वस्वी निर्दोष आहे तो असत्य कथन करणार नाही."
6) "आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणेही प्रमाण होऊ शकत नाहीत; कारण, कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञा-भंग केला आहे, अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील?"
7) "म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल; परंतु केवळ इंद्रियसुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही."
8) "मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही." एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढनिश्चयानुसार पुढे चालू लागले.
9) त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्याच्या मगोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राम्हण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले.
10) राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजाविषयी त्यांच्या निष्ठेमुळे ते परत येताना पुनःपुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. सूर्याप्रमाणे आपल्या तेजाने तळपणाऱ्या, कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरुन दृष्टीही काढू शकत नव्हते.
11) घरी परतण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, "आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी?"
*************************
_भाग चवथा समाप्त_
*************************
Comments
Post a Comment