8. बुद्धांवरील निष्ठा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
8. बुद्धांवरील निष्ठा
Loyalty to the Buddha
*************************
1) ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती.
2) त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चीवर तयार करण्यात दंग होते. तीन महिन्यात चीवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले.
3) त्यावेळी इसीदत्त आणि पूर्ण ह्या नावाने दोन राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की 'पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चीवर तयार करण्यात दंग आहेत. तीन महिन्यात चीवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते.'
4) तेव्हा इसीदत्त आणि पूरन ह्यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, "जेव्हा तथागत, अर्हत, सम्यक, संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव."
5) दोन तीन दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दुरवरुन तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसीदत्त आणि पूरन ह्यांना सांगितले, "तथागत, अर्हत, सम्यक-संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही करावयाचे असेल ते करावे."
6) तेव्हा इसीदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना आभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले.
7) नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. इसीदत्त व पूर्ण ह्यांनी त्यांना आभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले,
8). "तथागत, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले ह्याचे आम्हाला वाईट वाटले."
9) "तथागत, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासुन दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो."
10) "तथागत, आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कोशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत, नव्हे गेलेही, तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो."
11) "तथागत, पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्लदेश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही, की ते वज्जी सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही, की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले, तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो."
12) "पण तथागत, आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची ह्रदये उचंबळून आली की तथागत आमच्याजवळ आले."
13) "आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला."
14) "नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी, वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कोशलपर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन करुन ते म्हणाले,.."
15) "पण तथागत, जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कोशलदेशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची ह्रदये उचंबळून आली."
16) "जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला."
*********************सातवा खंड समाप्त
*********************
Comments
Post a Comment